विचार शलाका – ०१

दुःखभोग हे आपल्या पापकर्माची किंवा आपल्यातील वैरभावाची शिक्षा म्हणून आपल्या वाट्याला येतात असे नाही – तसे समजणे ही चुकीची कल्पना आहे. अज्ञानदशेतील जीवनाचा एक अविभाज्य भाग म्हणून जसे सुख किंवा सुदैव अनुभवास येते त्याप्रमाणेच दुःखभोग देखील वाट्यास येतात. आपल्याला आपल्या सत्यचेतनेपासून आणि परमेश्वरापासून विलग करणाऱ्या अज्ञानाचे अटळ परिणाम म्हणजे हर्ष-वेदना, आनंद-दुःख, सुदैव-दुर्दैव ही द्वंद्वे होत. केवळ परमेश्वराकडे परतण्यानेच दुःखभोगापासून आपली सुटका होऊ शकते. गतजन्मांतील कर्म अस्तित्वात असतात आणि बव्हंशी जे घडते ते त्यामुळेच; पण सर्वच गोष्टी काही त्याचे परिणाम नसतात. कारण आपण आपल्या स्वतःच्या चेतनेने आणि प्रयत्नांनी आपल्या कर्मांमध्ये सुधारणा घडवून आणू शकतो. ज्याप्रमाणे भाजणे हा आगीशी खेळण्याचा स्वाभाविक परिणाम असतो त्याप्रमाणे दुःखभोग हा आपल्या गतकालीन प्रमादांचा निव्वळ स्वाभाविक परिणाम असतो; दुःखभोग ही आपल्या गतकालीन प्रमादांची शिक्षा नसते. अशा काही अनुभवाच्या माध्यमातून, जीव हा त्याच्या साधनांद्वारे शिकत असतो आणि जोपर्यंत तो परमेश्वराकडे वळण्यास तयार होत नाही, तोपर्यंत तो विकसित होत राहतो, वृद्धिंगत होत राहतो.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 670)

श्रीअरविंद