समत्वपूर्ण दृष्टी
विचार शलाका – २०
समत्व हा ‘पूर्णयोगा’चा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे; वेदना आणि दुःखभोग असतानादेखील समत्व बाळगणे आवश्यक आहे आणि त्याचा अर्थ असा की, दृढपणे आणि शांतपणे चिकाटी बाळगली पाहिजे; अस्वस्थ वा त्रस्त किंवा निराश वा उद्विग्न होता कामा नये तर, ‘ईश्वरी संकल्पा’वर अविचल श्रद्धा ठेवून वाटचाल केली पाहिजे. समत्वामध्ये उदासीन स्वीकाराचा समावेश होत नाही. उदाहरणार्थ, एखाद्या वेळी साधनेमधील काही प्रयत्नांबाबत तात्पुरते अपयश आले तरी व्यक्तीने समत्व राखले पाहिजे; व्यक्तीने त्रस्त किंवा निराश होता कामा नये; तसेच ते अपयश म्हणजे ‘ईश्वरी इच्छे’चा संकेत आहे असे समजून, प्रयत्न सोडून देताही कामा नयेत. उलट, तुम्ही त्याचे कारण शोधून काढले पाहिजे, त्या अपयशाचा अर्थ शोधून काढला पाहिजे आणि विजयाच्या दिशेने श्रद्धापूर्वक मार्गक्रमण केले पाहिजे. अगदी त्याचप्रमाणे आजारपणाच्या बाबतीतसुद्धा – तुम्ही त्रस्त होता कामा नये, विचलित किंवा अस्वस्थही होता कामा नये, ‘ईश्वरी इच्छा’ आहे असे समजून तुम्ही ते आजारपण स्वीकारता कामा नये, तर ते शरीराचे अपूर्णत्व आहे या दृष्टीने तुम्ही त्याच्याकडे पाहिले पाहिजे; मानसिक दोष किंवा प्राणिक अपूर्णत्व यांच्यापासून सुटका करून घेण्यासाठी जसे तुम्ही प्रयत्न करता तसेच प्रयत्न हे शरीराचे अपूर्णत्व काढण्यासाठीसुद्धा केले पाहिजे.
– श्रीअरविंद
(CWSA 29 : 134)
- भारताचे पुनरुत्थान – ०८ - July 8, 2025
- भारताचे पुनरुत्थान – ०७ - July 7, 2025
- भारताचे पुनरुत्थान – ०६ - July 6, 2025