विचार शलाका – १३

तुमच्यामध्ये एक इच्छा असते आणि ती तुम्ही अर्पण करू शकता. आपल्या रात्रींविषयी जागरूक होण्याच्या इच्छेचे उदाहरण घेऊया. जर तुम्ही निष्क्रिय समर्पणाचा दृष्टिकोन स्वीकारलात तर तुम्ही म्हणाल, “मी जेव्हा जागरूक बनावे अशी ‘ईश्वरा’ची इच्छा असेल तेव्हा मी जागरूक होईन.” दुसऱ्या बाजूने, जर तुम्ही तुमची इच्छा ‘ईश्वरा’ला समर्पित कराल तर तुम्ही अशी इच्छा बाळगायला सुरुवात कराल आणि तुम्ही म्हणाल, “मी माझ्या रात्रींविषयी जागरूक होईन.” येथे तुम्ही, तसे व्हावे अशी इच्छा बाळगता, तुम्ही निष्क्रिय राहून नुसती वाट पाहत बसत नाही. “मी माझी इच्छा ‘ईश्वरार्पण’ करत आहे. मला माझ्या रात्रींविषयी जागरूक बनण्याची उत्कट इच्छा आहे, परंतु मला त्याचे ज्ञान नाही, ‘ईश्वरी’ संकल्पाद्वारे ते माझ्यामध्ये घडून यावे.” असा दृष्टिकोन जेव्हा तुम्ही बाळगता त्या वेळी समर्पण घडून येते. तुमची इच्छा ही स्थिरपणे कार्यरत असली पाहिजे, एखादी विशिष्ट कृती किंवा एखादी विशिष्ट गोष्ट हवी म्हणून नव्हे तर, तुम्हाला अंतिमतः जे ध्येय साध्य करून घ्यायचे आहे त्यावर तुमची सारी उत्कट अभीप्सा एकवटलेली असली पाहिजे. ही असते पहिली पायरी. जर तुम्ही दक्ष असाल, जर तुम्ही सावधचित्त असाल तर, तुम्हाला काय केले पाहिजे यासंबंधी प्रेरणा स्वरूपात एखादी गोष्ट निश्चितपणे उमगेल आणि मग मात्र तुम्ही त्या पद्धतीने ती गोष्ट केली पाहिजे. मात्र तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती अशी की, तुमच्या कृतीचे जे काही परिणाम असतील ते स्वीकारणे म्हणजे समर्पण. अगदी ते परिणाम तुम्ही जी अपेक्षा केली होती त्यापेक्षा वेगळे देखील असतील; पण त्यांचाही स्वीकार करणे म्हणजे समर्पण. या उलट दुसरीकडे, जर तुमचे समर्पण निष्क्रिय असेल तर तुम्ही काहीच करणार नाही, काही प्रयत्न करणार नाही, धडपड करणार नाही; तुम्ही सुखाने झोपी जाल आणि चमत्कार घडण्याची वाट पाहत राहाल.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 19)