विचार शलाका – ०७
व्यक्तीमध्ये एकदा का विचाराची शक्ती आली की, तेथे ताबडतोब क्षणोक्षणीच्या ह्या अगदी पशुवत अशा दैनंदिन जीवनापेक्षा काहीतरी उच्चतर अशी आकांक्षा अपरिहार्यपणे त्याच्यामध्ये उदय पावते; आणि त्यातूनच त्याला जगण्याची उमेद आणि ऊर्जा प्राप्त होते.
ही गोष्ट समूहांप्रमाणेच व्यक्तींनादेखील लागू पडते. त्या समूहाच्या धर्माच्या, त्याच्या ध्येयांच्या मूल्यावर, म्हणजे, ज्याला ते त्यांच्या अस्तित्वाची सर्वोच्च गोष्ट मानतात त्यावर त्या समूहांचे मूल्य अवलंबून असते, ते त्याच्या अगदी समप्रमाणात असते.
अर्थातच आपण जेव्हा धर्माविषयी बोलतो, तेव्हा आपल्याला जर ‘प्रमाण धर्म’ असे म्हणायचे असेल तर, व्यक्तीला त्याची जाण असो वा नसो, अगदी ती व्यक्ती ज्या धर्माचा नावलौकिक आहे, परंपरा आहे अशा एखाद्या धर्माशी संबंधित असली तरीही खरोखरच प्रत्येक व्यक्तीला तिचा तिचा एक धर्म असतो. एखादी व्यक्ती जरी त्यातील सूत्रे मुखोद्गत म्हणू शकत असेल, ती व्यक्ती विहित विधी करीत असेल तरीदेखील प्रत्येक व्यक्ती तिच्या तिच्या पद्धतीने धर्म समजून घेते आणि तशी वागते; धर्माचे नाव केवळ एकच असते पण हा समान धर्म, ज्याचे ते परिपालन करीत आहेत असे ते समजतात तो धर्म, प्रत्येक व्यक्तीगणिक समानच असतो असे नाही.
आपल्याला असे म्हणता येते की, त्या ‘अज्ञाता’विषयीच्या किंवा परमश्रेष्ठाविषयीच्या कोणत्याही अभीप्सेच्या अभिव्यक्तीविना मानवी जीवन जगणे हे खूप अवघड झाले असते. प्रत्येकाच्या हृदयात जर अधिक चांगल्या गोष्टीविषयीची, भले ती कोणत्याही प्रकारची असो, आशा नसती, तर जीवन जगत राहण्यासाठीची ऊर्जा मिळविणे व्यक्तीला कठीण झाले असते.
पण फारच थोडी माणसं स्वतंत्रपणे विचार करू शकतात, अशा वेळी त्यांनी स्वत:साठी स्वत:चाच एखादा वेगळा पंथ काढण्यापेक्षा, कोणत्यातरी धर्माचा स्वीकार करणे, त्यामध्ये सहभागी होणे, आणि त्या धार्मिक सामूहिकतेचा एक भाग बनणे हे अधिक सुकर असते. त्यामुळे वरवर पाहता, एखादी व्यक्ती ह्या धर्माची वा त्या धर्माची असते, पण हे फक्त वरवरचे भेद असतात.
– श्रीमाताजी
(CWM 09 : 355-356)
- रूपांतरणाची दीर्घकालीन प्रक्रिया – भाग ०५ - April 17, 2025
- रूपांतरणाची दीर्घकालीन प्रक्रिया – भाग ०४ - April 16, 2025
- रूपांतरणाची दीर्घकालीन प्रक्रिया – भाग ०३ - April 15, 2025