साधनेची मुळाक्षरे – २३

(श्रीअरविंदांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)
ईश्वराचा शोध घेणे हेच आध्यात्मिक सत्याच्या आणि आध्यात्मिक जीवनाच्या धडपडीचे खरोखर पहिले कारण आहे; हीच एकमेव आवश्यक गोष्ट आहे आणि त्या व्यतिरिक्त बाकी सारे शून्यवत आहे. एकदा का ईश्वराचा शोध लागला की त्याचे आविष्करण करणे – म्हणजे, सर्वप्रथम आपल्या मर्यादित चेतनेचे रूपांतर दिव्य चेतनेमध्ये करणे; अनंत शांती, प्रकाश, प्रेम, सामर्थ्य, परमानंद यांमध्ये जीवन जगणे; आपल्या मूलभूत प्रकृतीमध्ये आपण तो ईश्वरच होणे आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्या क्रियाशील प्रकृतीने, त्याचे वाहन, त्याचे माध्यम, त्याचे साधन बनणे होय. पण भौतिक स्तरावर एकतेचे तत्त्व प्रत्यक्ष कृतीत आणणे किंवा मानवतेसाठी कार्य करणे या गोष्टी म्हणजे सत्याचा चुकीच्या पद्धतीने केला गेलेला मानसिक अनुवाद आहे – या गोष्टी आध्यात्मिक साधनेचे पहिले किंवा खरे उद्दिष्ट असू शकत नाहीत. आधी आपण आपला आत्मा शोधला पाहिजे, ईश्वर शोधला पाहिजे, तेव्हाच आपल्याला, आपला आत्मा किंवा ईश्वर आपल्याकडून ज्या कार्याची अपेक्षा करत आहे, ते कार्य काय ते समजून येईल. तोपर्यंत आपले जीवन आणि आपली कर्में ही त्या ईश्वराचा शोध घेण्याची साधने किंवा त्या शोधासाठी साहाय्यक अशी ठरू शकतात पण त्यांचे इतर कोणतेही उद्दिष्ट असता कामा नये. जसजसे आपण आंतरिक चेतनेमध्ये विकसित होऊ लागतो, किंवा आपल्यामध्ये ईश्वराचे आध्यात्मिक सत्य जसजसे वृद्धिंगत होऊ लागते, तसतसे आपले जीवन आणि आपली कर्मे ही खरेतर, त्यामधूनच प्रवाहित झाली पाहिजेत, त्याच्याशीच एकात्म पावली पाहिजेत. पण त्याआधीच आपल्या मर्यादित मानसिक संकल्पनांच्या आधारे आपले जीवन आणि आपली कर्मे काय असावीत हे ठरविणे म्हणजे आंतरिक आध्यात्मिक सत्याच्या विकसनामध्येच खोडा घालण्यासारखे आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 05)

श्रीअरविंद