ईश्वरी कार्य
साधनेची मुळाक्षरे – ०४
प्रश्न : माताजी, इथे श्रीअरविंदांनी असे लिहिले आहे की, “ही मुक्ती, हे पूर्णत्व, ही समग्रतासुद्धा आपण आपल्यासाठी मिळविता कामा नये तर ती आपण ईश्वरासाठी मिळविली पाहिजे.” पण आपण जी साधना करतो ती तर आपल्या स्वतःसाठीच करत असतो ना?
श्रीमाताजी : पण श्रीअरविंद येथे नेमकेपणाने तेच तर सांगत आहेत. त्या मुद्द्यावर भर देण्यासाठीच त्यांनी असे लिहिले आहे. म्हणजे, आपण जे पूर्णत्व संपादन करणार आहोत ते आपल्या वैयक्तिक आणि स्वार्थी हेतुसाठी उपयोगात आणायचे नसून, ईश्वराचे आविष्करण शक्य व्हावे म्हणून, ते ईश्वराच्या सेवेत समर्पित करायचे आहे. वैयक्तिक पूर्णत्वाच्या स्वार्थी हेतुने आपण या विकासासाठी प्रयत्नशील नसून, ‘ईश्वरी कार्य’ सिद्धीस जावे म्हणून आपण त्याचा पाठपुरावा करत आहोत.
प्रश्न : पण आपण हे दिव्य ‘कार्य’ का करतो?
श्रीमाताजी : ईश्वराची तशी ‘इच्छा’ आहे, म्हणून आपण ते करतो. ते आपण आपल्या कोणत्याही वैयक्तिक कारणासाठी करत नाही, आणि ते तसे करता कामा नये. आपण ते करतो कारण ती ईश्वरी इच्छा आहे आणि ते ईश्वरी कार्य आहे.
जोपर्यंत कोणतीही वैयक्तिक आकांक्षा किंवा इच्छाआकांक्षा, किंवा एखादी स्वार्थी इच्छा त्यामध्ये मिसळलेली असते, तेव्हा त्यातून एक प्रकारची भेसळ निर्माण होते आणि मग ती ‘ईश्वरी इच्छे’ची तंतोतंत अभिव्यक्ती राहात नाही. केवळ एकच एक गोष्ट महत्त्वाची असते आणि ती म्हणजे ‘ईश्वर’ ‘त्याचा संकल्प’, ‘त्याचे आविष्करण’ आणि ‘त्याची अभिव्यक्ती’! आणि त्यासाठीच व्यक्ती इथे आहे, व्यक्ती म्हणजे दुसरे तिसरे काही नसून, ती ईश्वरच आहे. पण जोपर्यंत ‘मी’ पणाची भावना आहे, अहंभावना आहे; जोपर्यंत स्व-व्यक्तित्वाची भावना डोकावत असते, तेव्हा त्यातून असे सिद्ध होते की, व्यक्ती जशी असणे आवश्यक आहे तशी ती अजूनपर्यंत झालेली नाही. हे एका रात्रीत करणे शक्य आहे, असे मला म्हणायचे नाही पण तरीही खरंतर हेच सत्य आहे.
– श्रीमाताजी
(CWM 07 : 189-190)
- दुरिच्छेचे दुष्परिणाम - April 13, 2026
- दुर्वर्तनी मनुष्य आणि प्रामाणिकपणा - April 12, 2026
- निरय संकल्पनेचा खरा अर्थ - April 11, 2026




