ईश्वरी कृपा – ३१

प्रकाश आणि सत्य या गोष्टी असतील अशा परिस्थितीतच परम ‘कृपा’ तिचे कार्य करेल; मिथ्यत्व आणि अज्ञान यांनी तिच्यावर लादलेल्या परिस्थितीत, त्यांच्या अटींनुसार ती कार्य करणार नाही. कारण मिथ्यत्वाच्या मागण्यांपुढे जर तिला नमते घ्यावे लागले तर, तिचा स्वतःचा हेतुच विफल झाल्यासारखे होईल.

…अस्तित्वाचा एखादा भाग समर्पित आहे पण दुसरा भाग स्वतःला समर्पणाविना तसाच राखू इच्छित असेल, स्वतःच्याच पद्धतीने चालत असेल किंवा स्वतःच्या अटी लादत असेल तर, असे जेव्हा जेव्हा घडते त्या त्या प्रत्येक वेळी, तुम्ही स्वतःच ‘ईश्वरी कृपे’ला तुमच्यापासून दूर लोटत असता.

तुम्ही जर तुमच्या इच्छा, अहंकारी मागण्या आणि प्राणिक आग्रह तुमच्या भक्तिच्या आणि समर्पणाच्या आड लपवून ठेवत असाल; खऱ्या अभीप्सेच्या जागी तुम्ही या गोष्टी ठेवत असाल किंवा त्या गोष्टी अभीप्सेमध्ये मिसळत असाल आणि त्या गोष्टी ‘दिव्य शक्ती’वर लादण्याचा प्रयत्न करत असाल तर, ‘ईश्वरी कृपे’ने तुमचे रूपांतरण घडवून आणावे म्हणून तिला आवाहन करणे व्यर्थ आहे.

तुम्ही सत्याप्रत एका बाजूने स्वतःला खुले करत असाल किंवा तुमच्यामधील एखादा घटक सत्याप्रत खुला करत असाल आणि दुसऱ्या बाजूने सातत्याने विरोधी शक्तींना दारे खुली करत असाल, तर ‘ईश्वरी कृपा’ तुमच्या सन्निध राहील, ही अपेक्षा करणे फोल आहे. तुम्हाला जर तुमच्या मंदिरामध्ये ईश्वराच्या जिवंत ‘अस्तित्वा’ची प्राणप्रतिष्ठा करायची असेल तर तुम्ही ते मंदिर स्वच्छ राखणेच पाहिजे.

जेव्हा जेव्हा ‘ईश्वरी शक्ती’ हस्तक्षेप करते आणि सत्य घेऊन येते, तेव्हा प्रत्येक वेळी तुम्ही जर त्या सत्याकडे पाठ फिरवलीत आणि ज्या मिथ्यत्वाला घालवून दिले होते त्याला पुन्हा आमंत्रित केलेत तर, तुम्हाला अंतर दिल्याबद्दल ईश्वरी कृपेला तुम्ही दोष देता कामा नये, तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या इच्छेच्या खोटेपणाला आणि तुमच्या स्वतःच्या समर्पणाच्या अपूर्णतेला दोष दिला पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 03)

श्रीअरविंद