ईश्वरी कृपा – १४
“खरोखरच, ईश्वरच साऱ्या करुणेचा मूळस्रोत असतो, जर एखाद्याने पुन्हा पुन्हा त्याच त्याच चुका केल्या नाहीत तर त्याच्या सर्व चुका नाहीशा करण्याचे सामर्थ्य त्याच्यापाशीच असते; खऱ्या साक्षात्काराकडे घेऊन जाणारा मार्ग खुला करणारा ईश्वरच असतो.”
— श्रीमाताजी
(आपल्या ह्या विधानावर भाष्य करताना श्रीमाताजी एके ठिकाणी म्हणतात की,)
“व्यक्ती जोवर त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा करत राहते तोपर्यंत त्या चुका नाहीशा होऊ शकत नाहीत, कारण व्यक्ती प्रत्येक क्षणाला त्या चुका नव्याने करत असते. एखादी व्यक्ती जेव्हा चूक करते, मग ती गंभीर असो किंवा नसो, त्या चुकीचा तिच्या जीवनात काही ना काही परिणाम होत असतोच, ते कर्म संपुष्टात आणावेच लागते, पण व्यक्ती जर त्या ‘ईश्वरी कृपे’कडे वळेल तर त्या ‘कृपे’मध्ये, ते परिणाम नष्ट करण्याची ताकद असते; पण यासाठी व्यक्तिने त्याच दोषाची पुनरावृत्ती करता कामा नये. व्यक्ती त्याच त्याच मूर्खपणाच्या गोष्टी अनिश्चित काळपर्यंत करत राहील आणि ईश्वरी ‘कृपा’देखील त्याच्या परिणामांचा निरास अनिश्चित काळपर्यंत करत राहील, असे व्यक्तिने कदापिही समजता कामा नये, कारण हे असे घडत नाही. भूतकाळाचा भविष्यावर कोणताही परिणाम होणार नाही, इतका भूतकाळ पुसला जाऊ शकतो, शुद्ध केला जाऊ शकतो. मात्र एक अट आहे – व्यक्तीने तो भूतकाळ पुन्हा कायमस्वरूपी वर्तमानात ओढून आणता कामा नये, या एकाच अटीवर तो विशुद्ध केला जाऊ शकतो. तुम्ही स्वतःहूनच तुमच्यातील वाईट स्पंदनांना थांबविले पाहिजे, तुम्ही तेच ते स्पंदन पुन्हा पुन्हा अनिश्चित काळपर्यंत निर्माण करत राहता कामा नये.”
– श्रीमाताजी
(CWM 09 : 58)
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – १४ - September 21, 2023
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – १३ - September 20, 2023
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – ११ - September 18, 2023