योग आणि मानवी नातेसंबंध – ३७
व्यक्ती जेव्हा आध्यात्मिक जीवनात प्रवेश करते तेव्हा सामान्य प्रकृतीशी संबंधित असणारे कौटुंबिक बंध गळून पडतात – व्यक्ती त्या जुन्या गोष्टींबाबत तटस्थ होऊन जाते. ही तटस्थता म्हणजे एक प्रकारची मुक्तता असते. त्यामध्ये कटुता असण्याची अजिबात आवश्यकता नाही. जुन्या भौतिक जिव्हाळ्याचे बंध तसेच कायम राहणे म्हणजे सामान्य प्रकृतीला धरून राहण्यासारखे असते आणि त्यामुळे आध्यात्मिक प्रगतीला अडसर निर्माण होतो.
*
कौटुंबिक बंध परस्परांमध्ये अनावश्यक व्यवहार निर्माण करतात. आणि ईश्वराकडे पूर्णतः वळण्याच्या मार्गात ते आड येतात. योगमार्गाचा अवलंब केल्यावर, शारीरिक चेतनेच्या सवयींवर आधारित किंवा शारीरिक नात्यांवर आधारित नातेसंबंध हे कमीत कमी असले पाहिजेत आणि ते साधनेवर अधिकाधिक आधारित असले पाहिजेत. म्हणजे हे नातेसंबंध जुन्याच दृष्टिकोनाचे किंवा सामान्य पद्धतीचे असता कामा नयेत; तर एका साधकाचे इतर साधकांशी असावेत तसे असले पाहिजेत, एकाच मार्गावरून प्रवास करणारे जीव असावेत त्याप्रमाणे किंवा एकाच मातेची मुले असावीत तसे असले पाहिजेत.
*
सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती हीच की, तुम्ही अंतरंगातून श्रीमाताजींकडे वळले पाहिजे आणि फक्त आणि फक्त त्यांच्याकडेच वळले पाहिजे. यास साहाय्य व्हावे म्हणूनच बरेचसे बाह्य संपर्क टाळणे आवश्यक ठरते. परंतु लोकांबरोबर असलेले सर्वच संपर्क टाळणे, हे अभिप्रेतही नाही किंवा त्याची आवश्यकताही नाही. जर कोणती गोष्ट आवश्यकच असेल तर ती हीच की, त्या संपर्कांमध्ये तुम्ही स्वतःला पूर्णपणे झोकून न देता, तुमच्या संपर्कातील व्यक्तींना योग्य आंतरिक चेतनेनुसार भेटले पाहिजे. त्या पृष्ठवर्ती गोष्टी आहेत असे समजून त्यांना वागणूक दिली पाहिजे – त्यांच्याशी खूप सलगीने किंवा त्यांच्यामध्येच मिसळून गेल्याप्रमाणे वागता कामा नये.
– श्रीअरविंद
(CWSA 31 : 291, 291 & CWSA 32 : 459)
- प्रामाणिकपणा आणि चिकाटी - April 30, 2026
- ईश्वराच्या निवासाचे दरवाजे - April 29, 2026
- अप्रामाणिकपणाचा अडथळा - April 28, 2026






