मृत्युच्या भीतीवर मात कशी करावी? ०५
ज्यांची देवावर, त्यांच्या देवावर श्रद्धा आहे आणि ज्यांनी आपले जीवन देवाला वाहिले आहे अशा व्यक्तींसाठी तिसरी एक पद्धत आहे. अशा व्यक्ती पूर्णतः ईश्वराच्या झालेल्या असतात; त्यांच्या जीवनातील साऱ्या घटना या ईश्वरी इच्छेची अभिव्यक्ती असतात आणि अशा व्यक्ती त्या साऱ्या घटना केवळ शांतचित्ताने स्वीकारतात असे नाही तर,त्या घटनांचा स्वीकार त्या व्यक्ती कृतज्ञतेने करतात; कारण त्यांच्या बाबतीत जे काही घडते ते त्यांच्या भल्यासाठीच घडते याची अशा व्यक्तींना पूर्ण खात्री असते.त्यांची त्यांच्या देवावर आणि त्याच्याशी असलेल्या नात्यावर एक गूढ, गाढ श्रद्धा असते.देवाला त्यांनी त्यांच्या इच्छेचे पूर्णतया समर्पण केलेले असते आणि जीवन व मृत्युच्या अपघातांपासून संपूर्णतया स्वतंत्र असलेले असे देवाचे अविचल प्रेम व संरक्षण अशा व्यक्तींना जाणवत असते.आपल्या प्रेममूर्तीच्या चरणांशी निःशेषतया आत्म-समर्पित होऊन आपण पडून राहिलेलो आहोत किंवा त्याने त्याच्या हातांचा जणू पाळणा केला आहे आणि त्यात आपण पहुडले आहोत असा सदोदित अनुभव अशा व्यक्ती घेत असतात आणि एक प्रकारचे पूर्ण संरक्षण त्या व्यक्ती सदोदित अनुभवत असतात.त्यांच्या चित्तामध्ये कोठेही भीतीला,चिंतेला किंवा यातनांना जागाच नसते; या साऱ्या गोष्टींची जागा एका शांत, मोदयुक्त आनंदाने घेतलेली असते. परंतु असे अंतःसाक्षात्कारी (mystic) असणे हे प्रत्येकाचेच भाग्य नसते. (क्रमश:)
– श्रीमाताजी
(CWM 12 : 84)
- रूपांतरणाची दीर्घकालीन प्रक्रिया – भाग ०५ - April 17, 2025
- रूपांतरणाची दीर्घकालीन प्रक्रिया – भाग ०४ - April 16, 2025
- रूपांतरणाची दीर्घकालीन प्रक्रिया – भाग ०३ - April 15, 2025