मृत्युच्या भीतीवर मात कशी करावी? – ०४

…ज्या व्यक्ती स्वतःच्या भावनांमध्ये जीवन जगतात आणि भावनांना स्वतःच्या जीवनाचे नियंत्रण करू देतात अशा भावनाशील व्यक्तींबाबत मात्र ही (तर्कबुद्धीची) पद्धत तितकीशी उपयुक्त ठरू शकत नाही. निःसंशयपणे अशा व्यक्तींनी दुसऱ्या मार्गाचा म्हणजे आंतरिक शोधाच्या पद्धतीचा आश्रय घ्यायला हवा. सर्व भावभावनांच्या पलीकडे आपल्या अस्तित्वाच्या निःशब्द आणि अक्षोभ गहनतेमध्ये एक प्रकाश सातत्याने उजळलेला असतो, तो चैत्य चेतनेचा (Psychic Consciousness) प्रकाश असतो. त्या प्रकाशाचा शोध घ्या, त्यावर लक्ष एकाग्र करा, तो तुमच्या अंतरंगातच असतो. तुमच्या दृढ संकल्पाद्वारे, तो तुम्हाला निश्चितपणे गवसेल. ज्या क्षणी तुम्ही त्यामध्ये प्रवेश कराल, त्याच क्षणी तुमच्यामध्ये अमर्त्यतेची जाणीव जागृत होईल. तुम्ही कायमच जिवंत होतात, तुम्ही कायम जिवंत असणार आहात, हे तुम्हाला जाणवेल. तेव्हा, तुम्ही शरीरापासून पूर्णपणे स्वतंत्र होता. तुमचे जागृत अस्तित्व आता शरीरावर अवलंबून राहत नाही. तुम्ही आत्ता ज्यामधून आविष्कृत झाला आहात ते शरीर म्हणजे, अनेकानेक क्षणभंगुर आकारांपैकी, केवळ एक आकार आहे; हे तुम्हाला जाणवू लागते. आता मृत्यू हा अंत असत नाही तर, ते केवळ एक संक्रमण असते. मग सगळी भीती क्षणार्धात नाहीशी होते आणि तुम्ही जीवनामध्ये एखाद्या मुक्त मनुष्याप्रमाणे शांत खात्रीपूर्वक मार्गक्रमण करू लागता. (क्रमश:)

– श्रीमाताजी
(CWM 12 : 83-84)

अभीप्सा मराठी मासिक