प्रश्न : माणसं जर मृत्यूच पावली नाहीत, तर वाढत्या वयाबरोबर त्यांचे शरीर निरूपयोगी होणार नाही का?
श्रीमाताजी : नाही, तुम्ही चुकीच्या बाजूने पाहात आहात. त्यांच्या शरीराचा ऱ्हास झाला नाही तरच ते मृत्युपासून स्वत:ची सुटका करून घेऊ शकतील. शरीराचा ऱ्हास होतो त्यामुळेच तर ते मरण पावतात. त्यांचे शरीर निरुपयोगी होते त्यामुळेच तर ते मरण पावतात. त्यांना मृत्यू नको असेल तर, त्यांचे शरीर निरुपयोगी होता कामा नये… शरीराचा ऱ्हास होतो, प्रकृती खालावत जाते आणि नंतर पूर्णतः त्याला उतरती कळा लागून, अंतीमत: ते नाश पावते म्हणूनच मृत्यू आवश्यक होऊन बसतो. परंतु शरीरानेसुद्धा अंतरात्म्याच्या (Inner being) प्रगमनशील वाटचालीचे अनुसरण केले, चैत्य पुरुषाला (Psychic being) असते तशीच प्रगतीची आणि पूर्णत्वाची जाणीव शरीरालासुद्धा झाली तर, शरीर मृत पावण्याची कोणतीच आवश्यकता उरणार नाही. वय वाढत गेले म्हणून शरीराचा ऱ्हास होण्याचे काहीच कारण नाही. प्रकृतीचा हा केवळ एक नित्य-परिपाठ, सवय आहे. ‘सद्यस्थिती’त जे काही घडत आहे, त्याचा हा एक केवळ परिपाठ आहे. आणि नेमके हेच मृत्युचे कारण आहे.
…जर शरीर टिकून राहायचे असेल तर, त्याचा ऱ्हास होता कामा नये. तेथे क्षीणता असताच कामा नये. त्याने या एका बाजूवर विजय प्राप्त करून घेतला पाहिजे, तो म्हणजे, त्याचा ऱ्हास न होता, त्याचे रूपांतर झाले पाहिजे. त्याचा जर ऱ्हास होणार असेल तर अमर्त्यत्वाची शक्यताच उरत नाही.
– श्रीमाताजी
(CWM 05 : 111-115)
- संपूर्ण आणि समग्र ईश्वराधीनता - February 1, 2025
- भारत हाच जगातील असा एकमेव देश आहे… - January 26, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २३२ - January 24, 2025