सामान्य माणूस मृत्युच्या नुसत्या कल्पनेनेच भयभीत झालेला असतो. शास्त्रज्ञ मंडळी मृत्युवर मात करण्यासाठी संशोधन करत असतात. संत मंडळी आपल्याला ‘मरणाचे स्मरण असावे’ असे सांगतात. गूढवाद्यांना मृत्यू व त्यानंतरचे जीवन खुणावत राहते. तर अध्यात्ममार्गावर ज्यांची वाटचाल चालू झालेली असते त्यांच्यापैकी काहीजणांची जन्म-मृत्युच्या कोड्याची उकल व्हावी म्हणून धडपड सुरू असते. काहीही असले तरी, सर्वांनाच आपले जीवन अखंडित राहावे, मृत्युमुळे ते संपुष्टात येऊ नये, अशी आस असते. अमृत, अमरता, अमर्त्यत्व या गोष्टींची ओढ साऱ्यांनाच असते. जीवनाच्या अविनाशत्वाविषयी ही संवेदना निसर्गाने उपजतच मनुष्यामध्ये पेरलेली आहे. पण त्याचा खरा अर्थ सामान्य माणसाला नेमकेपणाने आजवर उलगडलेला नाही. श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांनी अमर्त्यता म्हणजे काय ते सांगून, अमर्त्यत्व कसे प्राप्त करून घेता येईल यासंबंधी मार्गदर्शन केले आहे.

– संपादक, अभीप्सा मासिक

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ३५

…या योगामध्ये (पूर्णयोगामध्ये) कोणताही मंत्र दिला जात नाही. अंतरंगातून श्रीमाताजींप्रत चेतना खुली होणे ही खरी दीक्षा होय आणि मन व प्राण यांच्यातील अस्वस्थता घालवून दिल्याने आणि केवळ अभीप्सेद्वारे ही दीक्षा प्राप्त होऊ शकते.

*

पूर्णयोगाच्या या साधनेचे सूत्र म्हणून केवळ एकच मंत्र उपयोगात आणला जातो, तो म्हणजे एकतर श्रीमाताजींचे नाम किंवा श्रीअरविंदांचे व श्रीमाताजींचे नाम! हृदयकेंद्रामध्ये एकाग्रता आणि मस्तिष्कामध्ये एकाग्रता ह्या दोन्ही पद्धती यामध्ये चालू शकतात; त्यांचे प्रत्येकाचे स्वत:चे असे परिणाम असतात. हृदयकेंद्रावर एकाग्रता साधली असता चैत्य पुरुष (Psychic being) खुला होतो आणि तो भक्ती, प्रेम आणि श्रीमाताजींशी एकत्व घडवून आणतो; हृदयामध्ये त्यांची उपस्थिती आणि प्रकृतीमध्ये त्यांच्या शक्तीचे कार्य घडवून आणतो. मस्तिष्ककेंद्रावर एकाग्रता साधली असता, मन हे आत्मसाक्षात्काराप्रत खुले होते; मनाच्या अतीत असणाऱ्या चेतनेप्रत, देहाच्या बाहेर असणाऱ्या चेतनेच्या आरोहणाप्रत आणि उच्चतर चेतनेच्या देहामधील अवतरणाप्रत मन खुले होते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 326)

*

श्रीअरविंद : श्रीमाताजींकडे जो जो कोणी वळला आहे तो माझा योग आचरत आहे. व्यक्ती पूर्णयोग ‘करू’ शकते असे समजणे ही एक मोठी चूक आहे. विशेषतः स्वतःच्या प्रयत्नांनिशी व्यक्ती या योगाचे आचरण करून, या योगाच्या सर्व बाजूंची पूर्तता करू शकते असे समजणे ही चूक आहे. कोणताच मनुष्य तसे करू शकत नाही. व्यक्तीने काय करायला हवे, तर स्वतःला श्रीमाताजींच्या हाती सोपवून द्यायला हवे आणि सेवेद्वारे, भक्तिद्वारे, अभीप्सेद्वारे स्वतःला त्यांच्याप्रत खुले केले पाहिजे; तेव्हा मग श्रीमाताजी त्यांच्या प्रकाशाद्वारे आणि शक्तिद्वारे त्या व्यक्तीमध्ये कार्य करू लागतील म्हणजे मग साधना घडेल. महान पूर्णयोगी बनण्याची आकांक्षा बाळगणे किंवा अतिमानसिक जीव बनण्याची आकांक्षा बाळगणे आणि त्या उद्दिष्टाप्रत मी कोठवर आलो आहे, हे स्वतःला विचारणे हीसुद्धा एक चूक आहे. श्रीमाताजींना समर्पित होणे आणि तुम्ही जे बनावे अशी त्यांची इच्छा आहे, तेच बनण्याची इच्छा बाळगणे हा खरा योग्य दृष्टिकोन आहे. उर्वरित सर्व गोष्टी या श्रीमाताजीच निश्चित करतात आणि तुमच्यामध्ये घडवून आणतात.

(Champaklal Speaks : 334-335)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ३४

(पूर्णयोगामध्ये कोणतीही एकच एक पद्धत अवलंबण्यात येत नाही. प्रत्येकाची त्याच्या त्याच्या प्रकृतीशी मिळतीजुळती अशी स्वतंत्र पद्धत असते, हे या योगाचे एक प्रकारे वेगळेपण आहे. पूर्णयोगाचे हे वैशिष्ट्य श्रीअरविंद यांच्या खालील पत्रांमधून अधोरेखित होते.)

योगाचे किंबहुना विश्व-बदलविणाऱ्या आणि प्रकृतीमध्ये परिवर्तन घडविणाऱ्या योगाचे परिपूर्ण तंत्र कोणते? एखादा हुक किंवा गळ टाकून माणसाला पकडले आणि एखाद्या पुलीद्वारे निर्वाणामध्ये किंवा स्वर्गामध्ये वर ओढून घेतले अशा प्रकारचे काही हे तंत्र नाही. विश्व-परिवर्तन करणाऱ्या योगाचे तंत्र हे, विश्वाप्रमाणेच विविधरूपी, वळणावळणाचे, सहनशील, सर्वसमावेशक असणे आवश्यक आहे. जर त्या तंत्राला सर्व अडीअडचणी किंवा शक्यता हाताळता आल्या नाहीत किंवा त्या तंत्राला, प्रत्येक आवश्यक घटकाला काळजीपूर्वकपणे हाताळता आले नाही तर, त्याला यश मिळण्याची शक्यता असेल का? आणि प्रत्येकालाच समजू शकेल अशा प्रकारचे एखादे परिपूर्ण तंत्र असे करू शकेल काय? (काव्यशास्त्रामधील) एखाद्या ठरावीक वृत्तामध्ये, थोडेफार फेरफार करून, एखादी छोटीशी कविता लिहिण्यासारखे हे नाही. तुम्ही जर ही कवितेची उपमा तशीच पुढे चालवली तर, विश्व-परिवर्तनाचे तंत्र म्हणजे महाभारताचेच महाभारत लिहिण्यासारखे आहे.

*

या योगामध्ये आत्म-निवेदनाचे आणि आत्म-दानाचे सार्वत्रिक तत्त्व सर्वांसाठी समानच आहे पण प्रत्येकाचा आत्मनिवेदनाचा आणि आत्म-दानाचा स्वतःचा असा एक मार्ग असतो. ‘क्ष’ चा मार्ग हा ‘क्ष’ साठी चांगला आहे, तसाच तुम्ही निवडलेला मार्ग हा तुमच्यासाठी चांगला आहे, कारण तो तुमच्या प्रकृतीशी मिळताजुळता आहे. अशा प्रकारची लवचीकता आणि विविधता योगामध्ये नसती आणि सर्वांना एकाच साच्यामध्ये बसवावे लागले असते तर योग म्हणजे एक कठोर मानसिक यंत्रसामग्रीच ठरला असता, तो एक जिवंत शक्ती बनला नसता.

*

योगमार्ग ही एक जिवंत गोष्ट असली पाहिजे, तो एखादा मानसिक सिद्धान्त नाही किंवा आवश्यक सर्व विभिन्नतांच्या विरोधात जिला चिकटून राहावी अशी, योग म्हणजे कोणतीही एकच एक अशी पद्धती नव्हे.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 294), (CWSA 29 : 103), (SABCL 24 : 1463)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ३३

पूर्णयोगाच्या प्रक्रियेच्या तीन अवस्था आहेत; त्या एकमेकींपासून वेगळ्या ओळखता येण्यासारख्या नाहीत किंवा त्या पूर्ण वेगळ्याही नाहीत; परंतु त्या एका विशिष्ट प्रमाणात क्रमबद्ध आहेत.

प्रथम, स्वतःच्या अतीत जाण्याची आणि ईश्वराशी संपर्क साधण्याची पात्रता येण्यासाठी किमान अगदी प्राथमिक प्रयास केले पाहिजेत ही पहिली पायरी. जे अतीत आहे आणि ज्याच्याशी आपण ऐक्य साध्य केले आहे त्याचा, आपले समग्र जाणीवयुक्त अस्तित्व रूपांतरित व्हावे म्हणून आपण आपल्या स्वतःमध्ये स्वीकार करणे ही दुसरी पायरी; आणि या रूपांतरित मनुष्यत्वाचा दिव्य कार्यकेंद्र म्हणून विश्वात उपयोग करणे, ही तिसरी पायरी होय.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 58)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ३२

व्यक्तीने स्वतःमध्ये असलेले सर्वकाही ईश्वराला निवेदित करणे, व्यक्ती स्वतः जे आहे ते आणि तिच्यापाशी जे जे काही आहे ते ते सर्व ईश्वराला अर्पण करणे; स्वतःच्या कल्पना, इच्छा, सवयी इत्यादी यांचा आग्रह न धरणे, उलट त्यांची जागा सर्वत्र, ईश्वरी ‘सत्या’ला त्याच्या ज्ञानाद्वारे, त्याच्या संकल्पाद्वारे आणि त्याच्या कार्याद्वारे घेऊ देणे म्हणजे समर्पण.

*

ईश्वराप्रत स्वत:ला सोपवून देणे म्हणजे समर्पण. व्यक्ती जे काही आहे आणि तिच्यापाशी जे जे काही आहे ते ते सारे ‘ईश्वरा’ला देऊ करणे; आपले स्वत:चे असे काहीही नाही, असा दृष्टिकोन बाळगणे; अन्य कोणत्याही नव्हे, तर केवळ ‘ईश्वरी’ इच्छेच्या आज्ञेचे पालन करणे; अहंकारासाठी नव्हे तर, ‘ईश्वरा’साठी जीवन व्यतीत करणे म्हणजे समर्पण.

*

समर्पण हे परिपूर्तीचे साधन असते हेच आपल्या साधनेचे पहिले तत्त्व आहे आणि जोपर्यंत अहंकार किंवा प्राणिक मागण्या आणि इच्छावासना यांना खतपाणी घातले जाते तोपर्यंत संपूर्ण समर्पण अशक्य असते. आणि तोवर आत्मदानदेखील अपूर्ण असते. आम्ही ही गोष्ट कधीच लपविलेली नाही. समर्पण अवघड असू शकते, ते तसे असतेही परंतु तेच तर साधनेचे खरे तत्त्व आहे. समर्पण अवघड असल्यामुळेच, कार्य पूर्ती होईपर्यंत ते स्थिरपणे आणि धीराने केले पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 67 & 75-76)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ३१

नकार
(श्रीअरविंदांनी साधकांना लिहिलेल्या पत्रांमधून…)

मी ज्या योग्य स्पंदनांविषयी म्हाणालो ती स्पंदने एकतर अंतरात्म्याकडून किंवा वर असणाऱ्या आध्यात्मिक प्रांतामधून आलेली असतात अथवा अंतरात्म्याच्या किंवा आध्यात्मिक प्रभावाने मनामध्ये किंवा प्राणामध्ये (vital) आकाराला येतात. एखादी व्यक्ती प्रामाणिकपणे अभीप्सा बाळगेल आणि जे त्याज्य आहे त्यास शक्य असेल तितका नकार देईल, तर तेव्हा आंतरात्मिक आणि आध्यात्मिक प्रभाव अधिकाधिक कार्य करेल, अधिकाधिक खरा सद्सदविवेक आणेल, योग्य स्पंदनांची निर्मिती करेल, त्यांना प्रोत्साहन देईल, त्यांना आधार देईल आणि चुकीची स्पंदने शोधून, त्यांना हतोत्साहित करेल आणि ती वगळेल. श्रीमाताजी आणि मी हीच पद्धत सर्वांना सांगत असतो.

*

इच्छांचा विलय म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे, हे मला समजले नाही. इच्छांना व्यक्तित्वातून बाहेर काढून टाकणे, नकार देणे, हे या योगाचे एक तत्त्व आहे. जी गोष्ट मनामधून नाकारण्यात येते ती बरेचदा प्राणामध्ये जाते, प्राणाने नाकारलेली गोष्ट ही शारीरिक स्तरावर जाऊन पोहोचते आणि शरीराने नाकारलेली गोष्ट ही अवचेतनामध्ये (subconscient) जाते, हे खरे आहे. अवचेतनातून हद्दपार केलेली गोष्ट ही तरीही वातावरणातील चेतनेमध्ये रेंगाळत राहण्याची शक्यता असते – तेथे तिचा व्यक्तीवर कोणताही ताबा नसतो आणि त्यामुळे ती समूळ काढून टाकणे शक्य असते.

*

प्रत्येक गोष्ट बाहेरून, म्हणजे वैश्विक प्रकृतीमधून येत असते, हे सर्वज्ञात वास्तव आहे. परंतु येणारी प्रत्येक गोष्ट स्वीकारलीच पाहिजे असे कोणतेही बंधन व्यक्तीवर असत नाही, व्यक्ती ती गोष्ट स्वीकारू शकते किंवा नाकारू शकते. भूतकाळामध्ये स्वीकाराची एक चिवट सवय जडलेली असेल तर, एकदम नकार द्यायला जमेल असे नाही, पण जर नकार देण्यामध्ये स्थिरपणे सातत्य राखले तर सरतेशेवटी व्यक्ती त्यात यशस्वी होईल. तुम्ही काय केले पाहिजे तर, कनिष्ठ अनुभवांना नकार दिला पाहिजे आणि आपले लक्ष एकमेव आवश्यक गोष्टीवर, म्हणजे… ‘प्रकाश’, ‘स्थिरता’, ‘शांती’, ‘भक्ती’ यांवर केंद्रित केले पाहिजे, त्याबाबत स्थिर अभीप्सा बाळगली पाहिजे. तुम्ही कनिष्ठ प्राणिक अनुभवांमध्ये रुची घेता आणि त्यांचे निरीक्षण करत राहता, त्यांच्याविषयी विचार करत राहता म्हणून त्या गोष्टी तुमचा ताबा घेतात आणि त्यामुळेच ईश्वराशी असलेला ‘संपर्क’ सुटतो आणि गोंधळ निर्माण होतो. तुम्ही या आधीही अशा प्रकारचे बरेच अनुभव घेतलेले आहेत आणि आता जेव्हा ते येतील तेव्हा त्यांना दृढपणे नकार देण्यासाठी तुम्ही तुमच्या मनाची तयारी केली पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 64-65)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ३०

…येथे धैर्याचा अर्थ ‘परम साहसाविषयीची आवड असणे’ असा आहे. आणि परम साहसाची ही आवड म्हणजे ‘अभीप्सा’ (Aspiration). अशी अभीप्सा जी, तुमचा पूर्णपणे ताबा घेते आणि कोणताही मागचा पुढचा विचार न करता, हातचे काहीही राखून न ठेवता, परतीच्या साऱ्या शक्यता नसतानाही, तुम्हाला ‘ईश्वरी’ शोधाच्या ‘महान साहसा’साठी झोकून देण्यास प्रवृत्त करते; ईश्वर-भेटीसाठीच्या महान साहसासाठी आणि त्याहूनही अधिक महान अशा ‘ईश्वरी साक्षात्काराच्या साहसा’साठी तुम्हाला झोकून देण्यास प्रवृत्त करते.

‘पुढे काय होईल?’ याविषयी एक क्षणभरही शंका उपस्थित न करता, मागे वळून न पाहता या साहसामध्ये तुम्ही स्वतःला झोकून देता.

…धैर्य आणि अभीप्सा या गोष्टी हातात हात घालून नांदतात. खरीखुरी अभीप्सा ही धैर्ययुक्त असते.

– श्रीमाताजी

(CWM 08 : 40-41)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – २९

(अभीप्सा, नकार आणि समर्पण या त्रयीला पूर्णयोगामध्ये योगसूत्राचे स्थान आहे.)

विश्वामध्ये जे जे काही केले जाते, त्या सर्व कृतींमागे ईश्वरच त्याच्या शक्तिद्वारा विद्यमान असतो पण तो त्याच्या योगमायेने झाकला गेलेला असतो आणि कनिष्ठ प्रकृतीमध्ये तो जे कार्य करतो ते ‘जिवा’च्या अहंकाराद्वारा करत असतो.

योगामध्येदेखील ईश्वर हाच ‘साधक’ आणि ‘साधना’ही असतो; त्याचीच ‘शक्ती’ स्वतःच्या प्रकाश, सामर्थ्य, ज्ञान, चेतना आणि ‘आनंद’ यांच्या साहाय्याने ‘आधारा’वर (मन, प्राण, शरीर यांवर) कार्य करते आणि जेव्हा आधार त्या शक्तिप्रत उन्मुख होतो, तेव्हा या सर्व दिव्य शक्ती त्या आधारामध्ये ओतल्या जातात आणि त्यामुळे साधना शक्य होते. परंतु जोपर्यंत कनिष्ठ प्रकृती सक्रिय असते, तोपर्यंत साधकाच्या व्यक्तिगत प्रयत्नांची आवश्यकता असतेच. हा आवश्यक असलेला व्यक्तिगत प्रयत्न म्हणजे अभीप्सा, नकार आणि समर्पण अशी त्रिविध तपस्या होय.

अभीप्सा जागरुक, निरंतर आणि अविरत असली पाहिजे – मनामध्ये तोच संकल्प, अंत:करणात तोच ध्यास, प्राणतत्त्वाची त्यालाच संमती, भौतिक-शारीरिक चेतना व प्रकृती ग्रहणक्षम आणि लवचीक करण्याची तीव्र इच्छा अशा स्वरूपाची अभीप्सा पाहिजे.

कनिष्ठ प्रकृतीच्या सर्व गतिविधींना नकार – मनाच्या कल्पना, मते, आवडीनिवडी, सवयी आणि रचना यांना नकार, की ज्यामुळे निश्चल-नीरव मनामध्ये खऱ्या ज्ञानाला पूर्ण मोकळी जागा मिळेल, – प्राणिक प्रकृतीच्या वासना, मागण्या, लालसा, संवेदना, आवेग, स्वार्थीपणा, गर्व, उद्धटपणा, कामुकता, लोभ, मत्सर, हेवेदावे, ‘सत्या’शी वैर यांना नकार, की ज्यामुळे निश्चल, विशाल, समर्थ आणि समर्पित अशा प्राणमय अस्तित्वामध्ये वरून खरी शक्ती आणि आनंद यांचा वर्षाव होईल – भौतिक-शारीरिक प्रकृतीची मूढता, संशय, अविश्वास, दिङ्मूढता, दुराग्रह, दुर्बोधता, क्षुद्रता, आळस, परिवर्तन-विमुखता, तामसिकता यांना नकार, की ज्यामुळे सतत अधिकाधिक दिव्य होत जाणाऱ्या देहात ‘प्रकाश’, ‘शक्ती’ आणि ‘आनंद’ यांचे खरे स्थैर्य प्रस्थापित होईल.

‘ईश्वर’ आणि त्याची ‘शक्ती’ यांना आपण आपल्या स्वत:चे, आपण जे काही आहोत आणि आपणाजवळ जे काही आहे त्या सर्वाचे, चेतनेच्या प्रत्येक स्तराचे आणि आपल्या प्रत्येक वृत्तींचे समर्पण केले पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 06)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – २७

सर्वसाधारणपणे आजवरचा योग हा आध्यात्मिक मनाच्या पलीकडे जात नाही – अनेकांना मस्तकाच्या शिखरावर ब्रह्माशी ऐक्य जाणवते, पण त्यांना मस्तकाच्याही वर असलेल्या चेतनेची जाणीव नसते. त्याच प्रमाणे सामान्य योगामध्ये व्यक्तीला ब्रह्मरंध्राप्रत होणार्याह जागृत आंतरिक चेतनेच्या (कुंडलिनी) आरोहणाची संवेदना असते; (या ब्रह्मरंधामध्ये प्रकृती ब्रह्म- चेतनेशी युक्त होते.) मात्र त्यांना ‘अवतरणा’चा (descent) अनुभव येत नाही. काही जणांना अशा गोष्टी अनुभवासही आल्या असतील पण, त्यांचे स्वरूप, त्यांचे तत्त्व किंवा समग्र साधनेमधील त्यांचे स्थान त्यांना उमगले होते की नाही, हे मला माहीत नाही. मला स्वतःला जोपर्यंत असा अनुभव आला नव्हता तोपर्यंत, मी तरी हे इतर कोणाकडून कधी ऐकले नव्हते. याचे कारण पूर्वीचे योगी जेव्हा आध्यात्मिक मनाच्या अतीत जात असत, तेव्हा ते समाधीमध्ये निघून जात असत; याचा अर्थ असा की, (आध्यात्मिक मनाच्या वर, ब्रह्मरंध्राच्या वर असणार्याा) या उच्चतर पातळ्यांविषयी सजग राहण्याचा त्यांनी प्रयत्न केला नव्हता – अतिचेतनेमध्ये (Superconscient) ‘निघून जाणे’ हे त्यांचे उद्दिष्ट असे, जागृत चेतनेमध्ये अतिचेतन ‘उतरविणे’ हे त्यांचे उद्दिष्ट नसे, परंतु हे माझ्या योगाचे उद्दिष्ट आहे.

*

’चित्’ (Chit) म्हणजे विशुद्ध चेतना – सत् चित् आनंद यामध्ये असते तशी. तर ’चित्त’ (Chitta) म्हणजे मानसिक-प्राणिक-शारीरिक चेतना यांचे संमिश्रण असलेले द्रव्य आहे; त्यातून विचार, भावना, संवेदना, आवेग इ. वृत्ती निर्माण होतात. पातंजल योगानुसार, या वृत्तीच पूर्णतः शांत करायच्या असतात, ज्यामुळे चेतना निश्चल होऊन, समाधीमध्ये प्रविष्ट होऊ शकेल. ‘चित्तवृत्तीनिरोधा’चे या (पूर्ण)योगात मात्र निराळे कार्य आहे. सामान्य चेतनेच्या वृत्ती येथे निश्चल करायच्या असतात आणि त्या निश्चलतेमध्ये उच्चतर चेतना आणि तिच्या शक्ती खाली उतरवायच्या असतात; जेणेकरून ही चेतना आणि तिच्या शक्ती प्रकृतीमध्ये रूपांतर घडवतील.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 377-378 and 438)

*

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – २६

पूर्णयोगामध्ये समग्र जीवन हे, अगदी बारीकसारीक तपशिलासहित रूपांतरित करायचे असते, ते दिव्यत्वामध्ये परिवर्तित करायचे असते.

इथे कोणतीच गोष्ट निरर्थक नसते आणि कोणतीच गोष्ट क्षुल्लक नसते. “जेव्हा मी ध्यानधारणा करत असेन, जेव्हा तत्त्वज्ञानाचा अभ्यास करत असेन किंवा (आध्यात्मिक) चर्चा ऐकत असेन तेव्हा मी प्रकाशाभिमुख अशा उन्मीलित स्थितीत राहीन आणि प्रकाशाप्रत आवाहन करेन; पण जेव्हा मी फिरायला बाहेर पडेन किंवा मी जेव्हा मित्रांना भेटेन तेव्हा मात्र हे सारे विसरून गेलो तरी चालेल,” असे तुम्ही म्हणू शकत नाही. जर तुम्ही अशा तऱ्हेचाच दृष्टिकोन ठेवलात तर त्याचा अर्थ असा होईल की, तुम्ही तसेच अरूपांतरित राहाल आणि मग तुम्ही ईश्वराशी खरेखुरे एकत्व कधीच साधू शकणार नाही. फार फार तर तुम्हाला उच्चतर जीवनाची थोडीफार झलक पाहायला मिळेल. परंतु तुम्ही नेहमीच ईश्वरापासून विभक्त राहाल.

तुमच्या ध्यानावस्थेत किंवा तुमच्या आंतरिक चेतनेमध्ये तुम्हाला काही अनुभव आले किंवा काही साक्षात्कार झाले तरीही तुमचे शरीर आणि तुमचे बाह्य जीवन मात्र तसेच अपरिवर्तित राहिलेले असेल. शरीर आणि बाह्य जीवन यांची अजिबात दखल न घेणारे असे आंतरिक प्रदीपन (illumination) हे फारसे उपयोगाचे नाही, कारण असे आंतरिक प्रदीपन जगाला ते जसे आहे तसेच सोडून देते. आजवर हे असेच घडत आले आहे. ज्यांना अगदी महान आणि शक्तिशाली साक्षात्कार झाला होता त्यांनीदेखील, आंतरिक शांतीमध्ये आणि स्थिरतेमध्ये कोणतीही बाधा येऊ नये म्हणून या जगापासून स्वतःला विलग केले होते; या जगाला आहे त्या परिस्थितीत सोडून दिले होते, त्यामुळे, दुःखकष्ट, मूर्खपणा, मृत्यू आणि अज्ञान यांवर कोणताही परिणाम न होता, त्या गोष्टी तशाच कायम राहिल्या; त्यांचे या भौतिक जगतावरील सार्वभौमत्व तसेच अबाधित राहिले. जे अशा तऱ्हेने या जगापासून विलग झाले होते त्यांच्यासाठी, या गडबडगोंधळापासून सुटका करून घेणे, अडचणींकडे पाठ फिरविणे आणि अन्यत्र एखादी आनंदी अवस्था शोधणे हे, सुखकर असू शकेल; पण ते या जगाला आणि जीवनाला आहे तशाच असुधारित आणि अरूपांतरित अवस्थेत सोडून जातात; आणि त्यांच्या स्वतःच्या बाह्य चेतनेलादेखील ते अरूपांतरित अवस्थेत सोडून जातात, आणि त्यांचे शरीरदेखील जसे होते तसेच, पुनरुज्जीवित न झालेल्या अवस्थेत ते सोडून जातात. परंतु जेव्हा या भौतिक जगात त्यांना परत यावे लागेल तेव्हा ते अगदी सामान्य माणसापेक्षादेखील सामान्य असू शकतात; कारण त्यांनी भौतिक वस्तुमात्रांवरील त्यांचे प्रभुत्व गमावलेले असते आणि त्यामुळे, त्यांचा जीवनव्यवहार विसंगत होण्याची तसेच येणाऱ्याजाणाऱ्या प्रत्येक शक्तीच्या दयेवर अवलंबून असण्याची शक्यता असते.

ज्यांचा हाच आदर्श आहे, त्यांच्यासाठी तो चांगला असू शकेल. परंतु हा आपला योग नाही. कारण आपल्याला या विश्वावर दिव्य विजय प्राप्त करून घ्यायचा आहे; या विश्वातील सर्व घडामोडी, गतीविधींवर विजय मिळवायचा आहे आणि इथेच त्या ‘ईश्वरा’चा साक्षात्कार घडवायचा आहे. परंतु ‘ईश्वरा’ने येथे राज्य करावे असे जर आपल्याला वाटत असेल तर आपल्यापाशी जे काही आहे, आपण जे काही आहोत, आपण येथे जे काही करत असतो ते सारे ईश्वरार्पण केले पाहिजे. एखादी गोष्ट कमी महत्त्वाची आहे किंवा ‘बाह्य जीवन आणि त्याच्या आवश्यकता या दिव्य जीवनाचा भाग असू शकत नाहीत,’ असा विचार आपण करून चालणार नाही. आपण जर असा विचार केला तर आपण आजवर जेथे आहोत तेथेच राहू आणि मग या बाह्य जगतावर आपण कधीच विजय मिळवू शकणार नाही, चिरस्थायी असे आपण काहीही केलेले नसेल.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 24-25)