‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ०६
ईश्वरी प्रभावाप्रत स्वत:ला खुले करणे हे या (पूर्ण)योगाचे संपूर्ण तत्त्व आहे. हा प्रभाव तुमच्या मस्तकाच्या वरती असतो आणि एकदा का तुम्हाला त्याची जाणीव झाली की, त्याने तुमच्यामध्ये प्रवेश करावा म्हणून तुम्ही केवळ त्यास आवाहन करायचे असते. ते ईश्वरीतत्त्व तुमच्या मनामध्ये, शरीरामध्ये शांतीच्या, प्रकाशाच्या, कार्यकारी शक्तीच्या रूपाने अवतरते; आनंदरूपाने अवतरते; साकार किंवा निराकार रूपात ते दिव्य अस्तित्व अवतरते. जोपर्यंत तुमच्याकडे ही चेतना असत नाही तोपर्यंत तुम्ही श्रद्धा बाळगली पाहिजे आणि खुलेपणाची आस बाळगली पाहिजे. अभीप्सा, आवाहन, प्रार्थना ह्या सर्व गोष्टी एकाच गोष्टीची विविध रूपे असतात आणि या सर्वच गोष्टी सारख्याच प्रभावी असतात. यांपैकी, तुमच्यापाशी जे कोणते रूप येते वा जे तुम्हाला अगदी सहजसोपे, स्वाभाविक वाटते ते तुम्ही अवलंबावे. दुसरा मार्ग एकाग्रतेचा. तुम्ही तुमची चेतना तुमच्या हृदयामध्ये एकाग्र करा (काहीजण मस्तकामध्ये वा मस्तकाच्या वर एकाग्र करतात.) आणि अंत:करणामध्ये श्रीमाताजींचे ध्यान करा आणि तेथे त्यांना आवाहन करा. तुम्ही यांपैकी कोणतीही एक गोष्ट करू शकता किंवा दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या वेळी करू शकता – जे तुम्हाला सहजस्वाभाविक वाटेल किंवा ज्या क्षणी तुम्ही जे करण्यासाठी प्रवृत्त व्हाल ते करावे. विशेषत: प्रथम एक गोष्ट आत्यंतिक निकडीची असते ती म्हणजे, मन निश्चल (quiet) करायचे आणि ध्यानाच्या वेळी, साधनाबाह्य असे सारे विचार, मनाच्या हालचाली हद्दपार करायच्या. अशा निश्चल मनामध्ये, अनुभूती येण्यासाठीची प्रगतिशील तयारी सुरू होते. परंतु लगेचच कोणती अनुभूती आली नाही तरी तुम्ही अधीर बनता कामा नये. कारण मनामध्ये संपूर्ण निश्चलता येण्यासाठी पुष्कळ वेळ लागतो; तुमची चेतना सिद्ध होईपर्यंत तुम्हाला प्रयत्न चालू ठेवावे लागतात.
– श्रीअरविंद
(CWSA 29 : 106)
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – २२ - September 29, 2023
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – २१ - September 28, 2023
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – २० - September 27, 2023