समर्पण – ११

समर्पणाविषयी बऱ्याच चुकीच्या कल्पना प्रचचित आहेत. समर्पण म्हणजे व्यक्तिमत्त्वाचा निरास (abdication) या कल्पनेने त्याकडे पाहतात पण ही घोडचूक आहे. कारण व्यक्ती ही दिव्य चेतनेचा एक पैलू आविष्कृत करण्यासाठी आलेली असते, आणि व्यक्तीच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रकृतीच्या अभिव्यक्तीमधूनच व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व निर्माण होत असते; जी कनिष्ठ प्रकृती त्या व्यक्तिमत्त्वाचा क्षय करत असते आणि त्यामध्ये विकृती निर्माण करत असते, त्या कनिष्ठ प्रकृतीच्या साऱ्या प्रभावांपासून हे व्यक्तिमत्त्व, ईश्वराबद्लचा योग्य दृष्टिकोन स्वीकारून परिशुद्ध केले जाते आणि त्यामुळे ते अधिकच वैयक्तिक, अधिकच त्याच्या स्वतःसारखे आणि अधिक समग्र बनते. व्यक्तिमत्त्वाचे सामर्थ्य आणि सत्यत्व हे अधिकच उजळून वैशिष्ट्यपूर्णतेने झळाळते. सर्व अंधकार आणि अज्ञानामध्ये मिसळलेले असताना, कनिष्ठ प्रकृतीच्या साऱ्या मळाने आणि मिश्रणाने मिश्रित झालेले असताना त्याचे चारित्र्य जेवढे नेमकेपणाने लक्षात आले नसते, तेवढे आता ते लक्षवेधी बनते. ते उन्नत होते, त्याचे उदात्तीकरण होते, त्याची क्षमता अधिक वृद्धिंगत होते, त्याच्या शक्यता कमाल प्रमाणात प्रत्यक्षात उतरतात.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 116)

श्रीमाताजी