पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – १६

राजयोग

 

…प्राणायाम म्हणजे त्याच्या वास्तविक अर्थाने, प्रकृतीमध्ये आणि स्वतःमध्ये असणाऱ्या प्राणिक शक्तीवर प्रभुत्व होय. हा प्राणायाम प्रत्येक राजयोग्याला आवश्यक असतो; पण तो अधिक सोप्या पद्धतीने करता येणे शक्य असते. राजयोग्याला एकच शारीरिक प्रक्रिया करण्याजोगी वाटते, जी उपयुक्त अशी असते, ती म्हणजे ‘नाडीशुद्धी’, श्वासोच्छ्वासाच्या नियमनाने नाडीसंस्थेचे शुद्धीकरण घडविणे. आणि ही शुद्धीकरणाची प्रक्रिया व्यक्ती आडवी पडलेली असताना, बसलेली असताना, वाचत असताना, लिहीत असताना, चालत असताना देखील करू शकते. या प्रक्रियेचे अनेक मोठे लाभ आहेत. मन आणि शरीर स्थिर करण्यासाठी या प्रक्रियेचा खूप चांगला उपयोग होतो; शरीरसंस्थेमध्ये दबा धरुन बसलेल्या प्रत्येक आजाराला पळवून लावण्यासाठी तिचा उपयोग होतो; गतजन्मांमध्ये साठलेल्या योगिक शक्तीला जागृत करण्यासाठी तिचा उपयोग होतो आणि जर का अशा प्रकारची सुप्त शक्ती अस्तित्वातच नसेल तर, कुंडलिनी शक्तीच्या जागृतीमधील शारीरिक अडथळे दूर करण्यासाठी तिचा उपयोग होतो.

परंतु ही प्रक्रियासुद्धा अनिवार्य नाही. कारण राजयोग्याला हे माहीत असते की, मन शांत केल्याने, तो शरीर देखील शांत करू शकतो; आणि त्याला हे ही ज्ञात असते की, मनावर प्रभुत्व मिळविल्याने, तो शरीर व प्राण या दोन्हीवरही नियंत्रण मिळवू शकतो. शरीर हे मनाचे स्वामी नाही, ते निर्माणकर्ताही नाही किंवा मनाचे नियमनकर्ताही नाही; तर मन हे शरीराचे स्वामी आहे, ते शरीराला घडवू शकते, त्याला वळण लावू शकते; हे राजयोगाचे महान रहस्य आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 01 : 508)

श्रीअरविंद