पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – १५
राजयोग
मनुष्याने शरीरामध्ये स्वतःचे पूर्णत्व साध्य करणे हे हठयोगाने दिलेले साधन आहे. पण जेव्हा एखादा मनुष्य देहाच्या वर उठतो तेव्हा तो त्रासदायक आणि निम्नतर प्रक्रिया म्हणून हठयोगाचा त्याग करतो आणि राजयोगामध्ये उन्नत होतो. मानव आता ज्या युगामध्ये उत्क्रांत झाला आहे त्या युगाशी मिळताजुळता असा हा योगमार्ग आहे. देह म्हणजेच मी, अशी समजूत बाळगणारी जाणिवेची अवस्था म्हणजे ‘देहात्मक बोध’. या देहात्मक बोधाच्या वर, उच्चतर जाणिवेमध्ये उन्नत होणे, ही राजयोगाच्या यशाची पहिली आवश्यक अट आहे. राजयोग्याच्या बाबतीत अशी एक वेळ येते की जेव्हा, त्याचा देह हा त्याला त्याचा वाटत नाही किंवा तो त्याच्या देहाची कोणतीही चिंता करत नाही. त्याला त्याच्या शारीरिक दुःखाने काळजी वाटत नाही किंवा शरीरसुखाने त्याला आनंदही होत नाही; ते त्या शरीरापुरतेच संबंधित असतात आणि तो राजयोगी त्यांना कोणताच थारा देत नसल्याने, या गोष्टी कालांतराने निघूनही जातात. तामसिक जडतत्त्व न उरल्यामुळे आणि आता तो राजसिक आणि आंतरात्मिक मनुष्य असल्याने, त्याची सुख व दुःखं ही हृदय आणि मनाशी संबंधित असतात. स्वतःच्या हृदयामध्ये किंवा स्वतःच्या बुद्धिमध्ये किंवा दोन्ही ठिकाणी, त्याला ईश्वराचा साक्षात्कार व्हावा म्हणून, त्याला हृदयातील आणि मनातील सुखदुःखांवर विजय प्राप्त करून घ्यावा लागतो. हृदयामध्ये ईश्वराचे दर्शन घेण्याची राजयोग्याला आस लागलेली असते.
– श्रीअरविंद
(CWSA 01 : 507)
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – २२ - September 29, 2023
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – २१ - September 28, 2023
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – २० - September 27, 2023