पूर्णयोग आणि बौद्धमत – ०१

श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांनी आपल्या जीवनात सर्वच पारंपरिक योगांचा, तत्त्वज्ञानांचा समन्वय करण्याचा प्रयत्न केला. श्रीअरविंदांनी तर त्यावर आधारित ‘Synthesis of Yoga’ या नावाचा ग्रंथराजच संपन्न केला. श्रीमाताजी गीतेच्या योगाच्या तसेच बौद्ध तत्त्वज्ञानाच्याही अभ्यासक आणि उपासक होत्या. त्यांना ध्यानावस्थेमध्ये भगवान बुद्धांचा संदेश प्राप्त झाला होता. श्रीमाताजींनी केलेल्या उपासनेच्या आधारावर, पूर्णयोगाच्या प्रकाशात, बौद्ध तत्त्वज्ञानाचे सारच शिष्यवर्गासमोर खुले केले. त्यांनी पूर्णयोगाच्या प्रकाशात, ‘धम्मपद’ या ग्रंथातील एकेक वचनाच्या आधारे, त्याचे स्पष्टीकरण केले.

श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांचे वैशिष्ट्य हे आहे की, त्यांना कोणत्याही धर्माचे, कोणत्याही पंथाचे, कोणत्याही तत्त्वज्ञानाचे, कोणत्याही संप्रदायाचे वावडे नव्हते. वैश्विक व्यवस्थेमध्ये, प्रत्येक अवताराचे त्याचे त्याचे म्हणून एक विशिष्ट असे कार्य असते. आणि हे सारे अवतार म्हणजे वैश्विक उत्क्रांतीच्या मार्गावरील विविध टप्पे असतात, अशी त्यांची धारणा होती. त्यामुळे या सर्वच विचारधारांमधील सार ग्रहण करण्याची स्वीकारशीलता आणि त्या विचारधारांमधील कालबाह्य गोष्टींचा त्याग करण्याची विचक्षणता त्यांच्यापाशी होती. सर्वच तत्त्वज्ञानांमधील सार घेऊन, त्याच्या आधारावर पुढे पूर्णयोगाची मांडणी श्रीअरविंद व श्रीमाताजी यांनी केलेली दिसते.

‘धम्मपद’ या ग्रंथाला बौद्ध तत्त्वज्ञानामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. आध्यात्मिक जीवनाची पूर्वतयारी कशी करावी यासंबंधी, तसेच दैनंदिन जीवनामध्ये आचरण कसे असावे यासंबंधी, अनेक मौलिक विचार या ग्रंथामध्ये मांडण्यात आलेले आहेत. तेव्हा धम्मपदामधील मूळ वचने आणि त्याचे श्रीमाताजीकृत स्पष्टीकरण यांतील काही निवडक भाग आपण नव्याने सुरु होणाऱ्या लेखमालिकेमध्ये विचारार्थ घेणार आहोत.

श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या लिखाणामधून, आपल्या पूर्णयोगाच्या वाटचालीमध्ये बौद्धविचाराचे नेमके स्थान कोणते, ह्याचाही बोध जाणकारांना होईल, असा विश्वास वाटतो. वाचक त्याला नेहमीप्रमाणेच प्रतिसाद देतील अशी आशा आहे.