एखाद्याकडे संपूर्ण पारदर्शी प्रामाणिकता हवी. प्रामाणिकपणाचा अभाव हेच आज आपणाला भेडसावत असणाऱ्या सर्व अडचणींचे मूळ आहे. सर्व माणसांमध्ये अप्रामाणिकपणा आहे. या पृथ्वीवर केवळ शंभर माणसं अशी असतील की, जी संपूर्णपणे प्रामाणिक आहेत. माणसाची मूळ प्रकृतीच त्याला अप्रामाणिक बनविते – ती खूप जटिल आहे, कारण तो सातत्याने स्वत:ला फसवत असतो, स्वत:पासून सत्य लपवत असतो, स्वत:साठी सबबी सांगत असतो.

योग हा अस्तित्वाच्या सर्व अंगांनिशी प्रामाणिक बनण्याचा मार्ग आहे.

संपूर्णत: प्रामाणिक असणे अवघड आहे पण एखादा किमान मानसिकरीत्या तरी प्रामाणिक बनू शकतो; किमान ह्याची तरी आपण ऑरोविलवासीयांकडून अपेक्षा ठेवू शकतो. दिव्य शक्ती आहे, पूर्वी कधीही नव्हती अशा रीतीने ती उपस्थित आहे; पण माणसांच्या अप्रामाणिकपणामुळे ती येथे अवतरीत होण्यापासून रोखली जात आहे, त्यामुळे तिची अनुभूती येऊ शकत नाही.

सर्व जगच खोटेपणामध्ये, असत्यामध्ये जगत आहे, आतापर्यंतचे माणसांमाणसांतील सर्व नातेसंबंध हे खोटेपणा व फसवणुकीवर आधारलेले आहेत. राष्ट्राराष्ट्रातील राजनैतिक संबंधही खोटेपणावर आधारलेले आहेत. त्यांना शांती हवी आहे असा ते एकीकडे दावा करतात, आणि त्याचवेळी ते स्वत:ला शस्त्रास्त्रांनी सुसज्ज करीत आहेत. परिवर्तित जगामध्ये माणसामाणसांमधील व राष्ट्रांमधील केवळ पारदर्शी प्रामाणिकतेलाच थारा असेल.

‘ऑरोविल’ हा या प्रयोगातील पहिला प्रयत्न आहे.

– श्री माताजी
(CWM 13 : 268)

श्रीमाताजी