ऑरोविल ह्या प्रकल्पाचे उद्घाटन दि. २८ फेब्रुवारी १९६८ रोजी झाले. त्याच्या संस्थापक श्रीमाताजी यांनी, ऑरोविल विषयीची त्यांची भूमिका ‘ऑरोविलची सनद’ यामध्ये स्पष्ट केली आहे. हा उद्घाटनाचा कार्यक्रम चालू असताना, ‘ऑल इंडिया रेडिओ’वरून या सनदीचे सोळा भाषांमध्ये प्रक्षेपण करण्यात आले.

ऑरोविल मधील लहान मोठे निर्णय घेताना, धोरणे ठरविताना या सनदीचा आधार घेतला जातो. यामध्ये नमूद केलेल्या संकल्पना प्रत्यक्ष व्यवहारात उतरविण्याचा प्रयत्न केला जातो. ऑरोविलमध्ये जीवन जगू इच्छितात, त्यांच्यासाठी असलेली ही मार्गदर्शक तत्त्वेच आहेत.

१२४ देशांतील व भारताच्या २३ राज्यांतील प्रत्येकी एक युवक व एक युवती अशा प्रतिनिधींनी आपापल्या मायभूमीतून मूठभर माती आणली आणि ती ऑरोविलच्या केंद्रस्थानी असणाऱ्या संगमरवरी कमळामध्ये समारंभपूर्वक ठेवण्यात आली. श्रीमाताजींनी फ्रेंचमध्ये लिहिलेली ‘ऑरोविलची सनद’ देखील ह्यासोबत ठेवण्यात आली.

…ऑरोविलची पायाभरणी झाली. वैश्विक एकतेचा पाया रचला गेला.