…अशीही काही माणसं असतात, जी थोडंफार काही शिकलेली असतात, ती कमी अधिक प्रमाणात गूढवादी असतात वा पुनर्जन्मावर त्यांचा बालीश विश्वास असतो. त्यांना असे वाटते की अशी एक छोटीशी व्यक्ती असते की जी, भौतिकाचे वस्त्र पांघरते, म्हणजे शरीर धारण करते आणि जेव्हा हे वस्त्र गळून पडते तेव्हा ती निघून जाते आणि नंतर परत दुसरे वस्त्र पुन्हा धारण करते… जणू एखाद्या बाहुलीचे कपड़े बदलावेत त्याप्रमाणे. काही लोकांनी तर यावर अगदी गांभीर्याने त्यांच्या गतजीवनातील गोष्टी सांगणारी पुस्तके लिहिली आहेत, ते अगदी माकड होते तेव्हापासूनच्या जीवनातील गोष्टी; हा निव्वळ बालीशपणा आहे.
कारण हजारापैकी नऊशे नव्व्याणव वेळी, केवळ त्या अस्तित्वाच्या केंद्रस्थानी असणारी एक छोटीशी चैत्य रचना मृत्यूनंतर कायम राहते, बाकी सर्व गोष्टी विरघळून जातात, तुकडेतुकडे होऊन इथे तिथे विखरून जातात आणि त्यांची व्यक्तिविशिष्टता, व्यक्ती त्यांची पृथागात्मता टिकून राहत नाही.
आत्ता, या भौतिक जीवनामध्ये, भौतिक व्यक्ती जे काही करीत आहे त्यामध्ये चैत्य पुरुष कितीवेळा सहभागी होतो ?… जे कोणी योगसाधना करतात, थोडेफार अनुशासित आहेत त्या माणसांविषयी येथे मी बोलत नाही; जीवनामध्ये मध्यस्थी करू शकेल, मार्गदर्शन करू शकेल इतपत ज्यांचा चैत्यपुरुष विकसित झालेला आहे, चैत्यपुरुषाची अशी क्षमता ज्यांच्यापाशी आहे अशा एकंदर माणसांविषयी मी बोलत आहे – काहींची वर्षच्या वर्षं कोणत्याही चैत्य मध्यस्थीविना जातात.
आणि तरीसुद्धा ते तुम्हाला येऊन सांगतात की, ते अमुक एका देशामध्ये जन्मले होते, त्यांचे आईवडील कसे होते, ते कोणत्या घरामध्ये राहायचे, त्यांच्या चर्चचे छप्पर कसे होते, त्यांच्या शेजारी कसे जंगल होते, जीवनातील अशा प्रकारच्या खूप साधारण गोष्टी, घटना.. या सर्व गोष्टी निव्वळ मूर्खतापूर्ण आहेत कारण त्या पूर्णतया पुसल्या जातात, त्या तशाच टिकून राहत नाहीत;
एखाद्या व्यक्तीमध्ये जीवनातील एखाद्या विशिष्ट अशा क्षणाची आठवण टिकून राहू शकते : जेव्हा काही खास अशी परिस्थिती असते, काही महत्त्वाचे क्षण असतात, असे क्षण की जेव्हा चैत्य अस्तित्वाने आकस्मिकपणे त्यामध्ये सहभाग घेतलेला असतो; आंतरिक हाकेपोटी वा आत्यंतिक निकडीपोटी चैत्य अस्तित्वाने आकस्मिकपणे हस्तक्षेप केलेला असतो अशा वेळी त्या क्षणाची स्मृती चैत्य स्मृतीमध्ये कोरल्यासारखी होते. जेव्हा तुमच्याकडे अशी चैत्य स्मृती असते तेव्हा तुम्हाला जीवनातील त्या क्षणाची परिस्थिती, विशेषत: आंतरिक भावना, त्या क्षणी सक्रिय असलेली जाणीव आठवते. आणि मग ती काही सहसंबंधांनिशी, तुमच्या अवतीभोवती जे होते त्यानिशी, एखादा उच्चारलेला शब्द, एखादा ऐकलेला वाक्प्रयोग यानिशी तुमच्या जाणिवेसोबत राहते. पण सर्वात महत्त्वाचे काय असेल तर ते म्हणजे, तुमचा आत्मा ज्या स्थितीमध्ये होता ती आत्म्याची स्थिती वा अवस्था; कारण ती अवस्थाच कोरल्याप्रमाणे स्पष्टपणे टिकून राहते. ह्याच चैत्य जीवनाच्या खाणाखुणा असतात, की ज्या गोष्टींचा खोल ठसा उमटलेला होता, त्याच्या घडणीमध्ये ज्यांचा सहभाग होता. त्यामुळे जेव्हा तुम्हाला तुमच्या चैत्य अस्तित्वाचा सातत्याने, नेहमी, स्पष्टपणे असा शोध लागतो तेव्हा यासारख्या गोष्टीच तुम्हाला आठवतात.
या अगदी अल्पस्वल्प असू शकतात, पण त्या एखाद्याच्या आयुष्यातील चमकदार गोष्टी असू शकतात पण माणूस असे सांगू शकत नाही की, ”मी असा असा माणूस होतो, मी असे असे केले, मी या नावाने ओळखला जात होतो, मी असे करत असे, मी तसे करीत असे..”
अन्यथा, तारीख, स्थळ, देश, तो काळ हे सर्व सांगण्याइतपत परिस्थितीचे एकीकरण झाले असण्याची ती दुर्मिळ घटिका असली पाहिजे. असे घडू शकते. स्वाभाविकपणेच चैत्य जाणीवच त्यामध्ये अधिकाधिक अंशाने सहभागी होते आणि त्यातून स्मृतींचा साठा वाढत राहतो. अशा वेळी व्यक्तीला मागील जन्मांचे स्मरण होऊ शकते पण ते त्याच्या सर्व तपशीलानिशी नक्कीच नाही. व्यक्ती काही ठरावीक क्षणांविषयी असे म्हणू शकते, “हे असे असे होते” किंवा ‘मी अशी होते.” इ.
….पण येथे आवश्यकता कशाची आहे तर व्यक्तीचे अस्तित्व हे चैत्य पुरुषाशी पूर्णपणे एकात्म पावलेले असावे, व्यक्तीचे संपूर्ण अस्तित्वच त्याच्याभोवती रचले गेले असावे, त्याचे संपूर्ण अस्तित्व – त्याच्या छोट्या छोट्या भागांसहित, सर्व घटकांसहित, व्यक्तित्वाच्या सर्व गतिविधी, हालचाली ह्या चैत्य केंद्राभोवती गुंफलेल्या असल्या पाहिजेत – या सर्वांनिशी एकसंध एकच एक असे, पूर्णत: ईश्वराभिमुख झालेले अस्तित्व तयार झाले असले पाहिजे; असे झाले असता, जेव्हा देह पडेल (मृत्यू येईल) तेव्हाही ते अस्तित्व टिकून राहील. पूर्णत: तयार झालेला जागृत जीवच अशा रीतीने गत जन्मामध्ये काय घडले होते ते नेमकेपणाने आठवू शकतो. त्याच्या जाणिवेतील काहीही न गमावता तो एका जन्मातून दुसऱ्या जन्मामध्येदेखील जागृतपणे जाऊ शकतो. या पृथ्वीवर अशा अवस्थेपर्यंत पोहोचलेले किती जीव असतील?… मला वाटते, फार नाहीत. आणि सहसा त्यांची ही साहसं सांगत बसण्यास असे जीव फारसे उत्सुक नसतात.
– श्रीमाताजी
(CWM 05 : 32-34)
- संपूर्ण आणि समग्र ईश्वराधीनता - February 1, 2025
- भारत हाच जगातील असा एकमेव देश आहे… - January 26, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २३२ - January 24, 2025