प्रश्न : आपल्यापैकी किती जणांना मागील जीवनांचे स्मरण आहे?
श्रीमाताजी : आपल्या चेतनेमधील काही भागांना स्मरण असते. पण हा खूप धोकादायक विषय आहे, कारण मानवी मनाला एकूणातच कल्पनारम्यतेची आवड असते. त्याला या पुनर्जन्माच्या सत्यतेविषयी माहिती मिळाल्याबरोबर, ते ताबडतोब त्याभोवती सुंदर कहाण्या रचू इच्छिते. अनेक जण तुम्हाला, हे जग कसे तयार झाले, ते भविष्यात कसे कसे प्रगत होणार आहे; तुम्ही गतजन्मांमध्ये कुठे आणि कसे जन्माला आला होतात आणि ह्या जन्मानंतर तुम्ही कसे असाल, तुम्ही आत्तापर्यंत कशा कशाप्रकारे जीवन जगले होतात आणि यानंतरची तुमची जीवने कशी असतील, याविषयी अद्भुत कहाण्या ऐकवतील. या सगळ्या गोष्टींचा आध्यात्मिक जीवनाशी काहीएक संबंध नाही.
गत जन्मांची खरीखुरी आठवण हा समग्र ज्ञानाचा खरोखरच भाग असू शकतो पण अशा प्रकारच्या कल्पनारम्यतेच्या मार्गाने ती स्मृती प्राप्त होत नाही. एका बाजूने जशी ती वस्तुनिष्ठ ज्ञान आहे, तद्वतच ती खाजगी आणि व्यक्तिनिष्ठ अनुभवावरही मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे आणि इथेच नवकल्पना, विकृती वा मिथ्या कल्पनांच्या रचना यांना वाव मिळतो.
या गोष्टींच्या सत्याप्रत पोहोचावयाचे असेल तर, अनुभव घेणारी तुमची चेतना, जाणीव ही खूप शुद्ध, पारदर्शक, कोणत्याही प्राणिक वा मानसिक हस्तक्षेपापासून मुक्त, तुमची वैयक्तिक मते, भावना यांपासून मुक्त, गोष्टींचे स्वत:च्याच तऱ्हेने स्पष्टीकरण वा विवरण करण्याच्या मनाच्या सवयीपासून मुक्त पाहिजे. गत जन्मांचा अनुभव हा खरा असू शकतो, पण तुम्ही जे काही पाहिले असते ते आणि तुमचे मन त्याचे जे स्पष्टीकरण करते, वा रचना उभारते त्या दोन्हीमध्ये भलीमोठी दरी असण्याची नेहमीच शक्यता असते. जेव्हा तुम्ही मानवी भावभावनांच्या वर उठता, मनापासून वर उठता तेव्हाच तुम्ही त्याच्या सत्याप्रत पोहोचू शकता.
– श्रीमाताजी
(CWM 03 : 40-41)
- संपूर्ण आणि समग्र ईश्वराधीनता - February 1, 2025
- भारत हाच जगातील असा एकमेव देश आहे… - January 26, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २३२ - January 24, 2025