जेव्हा भौतिक परिस्थिती ही काहीशी कठीण असते असते आणि त्यातून काहीशी अस्वस्थता येते अशा वेळी, त्या परमेश्वराच्या इच्छेसमोर पूर्णतः समर्पित कसे व्हायचे हे जर व्यक्तीला माहीत असेल, म्हणजे जीवन किंवा मृत्यू, आरोग्य किंवा आजारपण, याच्याविषयी यत्किंचितही काळजी न करता, जर व्यक्ती समर्पित होऊ शकली तर, तिचे समग्र अस्तित्व त्वरेने त्या ईश्वराच्या जीवन आणि प्रेमाच्या कायद्याच्या सुसंवादामध्ये प्रवेश करते आणि सर्व शारीरिक अस्वास्थ्यता नाहीशी होऊन, त्याची जागा एका स्वस्थ, गहन आणि शांतिमय अशा कल्याणाने घेतली जाते.

माझ्या हे पाहण्यात आले आहे की, ज्यामध्ये व्यक्तीला प्रचंड शारीरिक सहनशीलतेची आवश्यकता असते, अशा कार्याला जेव्हा व्यक्ती सुरुवात करते, तेव्हा तिला ज्या अडचणींना सामोरे जावे लागणार असते, त्या कल्पनेनेच व्यक्ती हबकून जाते. त्यापेक्षा प्रत्येक क्षणी वर्तमानातील अडचणींकडे पाहणे हे अधिक शहाणपणाचे असते; त्यामुळे आपले प्रयत्न अधिक सोपे होतात; कारण आपल्या वाट्याला येणारा प्रतिकार हा नेहमीच आपल्या सामर्थ्याच्या प्रमाणात असतो.

वास्तविक, आपले शरीर हे एक अद्भुत साधन आहे; परंतु त्याचा उपयोग कसा करावयाचा हे आपल्या मनाला समजत नाही. शरीराच्या सौष्ठवाचे, त्याच्या लवचीकतेचे पोषण न करता, ते त्याला पूर्वाधारित कल्पना आणि प्रतिकूल सूचनांमधून येणाऱ्या विशिष्ट चौकटीमध्ये बसवते.

परंतु हे प्रभो, तुझ्याशी एकरूप होणे, तुझ्यावरच विश्वास ठेवणे, तुझ्यामध्ये निवास करणे, तूच होऊन राहणे हेच परम विज्ञान आहे; आणि मग असा माणूस जो तुझ्या सर्वसमर्थतेचे आविष्करण करणारा बनतो, तेव्हा त्याला कोणतीच गोष्ट अशक्य असत नाही. हे प्रभो, एखादी मौन आराधना असावी, एक प्रकारचे शांत भजन असावे त्याप्रमाणे माझी अभीप्सा तुझ्याप्रत उदित होत आहे, आणि तुझ्या दिव्य प्रेमाने माझे हृदय उजळून निघत आहे. हे दिव्य स्वामी, मी तुला नतमस्तक होऊन, मी तुला प्रणिपात (प्रणाम) करत आहे.

– श्रीमाताजी
(CWM 01 : 101)