अजूनही काही प्रकारचे असमतोल असतात. (आता मी जे योगसाधना करतात किंवा आध्यात्मिक जीवन म्हणजे काय आहे हे ज्यांना माहीत असते आणि त्यानुसार, त्या मार्गावर वाटचाल करण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्याविषयी बोलत आहे.) तुमच्या अंतरंगातील एखाद्या भागाला, मग तो मानसिक असेल, प्राणिक असेल किंवा शारीरिक सुद्धा असू शकेल, त्याला नीटसे काहीतरी उमगलेले असते, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी अभीप्सा असते, विशिष्ट दृष्टिकोन असतात. आणि तो भाग चांगल्या रीतीने शक्तिग्रहण करत असतो आणि चांगली प्रगती करत असतो. आणि असे काही भाग असतात की, जे अशी प्रगती करू शकत नाहीत, आणखीही असे काही भाग असतात की, ज्यांना हे काही नकोच असते (अर्थात हे खूपच वाईट आहे.) पण असेही काही भाग असतात, की ज्यांना इच्छा असते पण ते काही करू शकत नसतात, त्यांच्याकडे तशी क्षमता नसते, ते तयार नसतात.
म्हणजे, तुमच्यामध्ये असे काही असते की, जे ऊर्ध्वमुखी उन्नत होत असते आणि काही असेही असते की, जे जागचे हालत नाही. आणि तेच प्रचंड असमतोल निर्माण करण्यास कारणीभूत ठरते. आणि त्याचे प्रतिबिंब कोणत्या ना कोणत्या आजारमध्ये पडते, कारण तुम्ही आंतरिकरित्या इतक्या तणावपूर्ण अवस्थेत असता – कोणीतरी अक्षम असते किंवा कोणीतरी अडून राहते, ते अजिबात हालचाल करत नाही आणि एखाद्या कोणालातरी मात्र वाटचाल करावयाची असते. आणि यातूनच एक अत्यंत भीतीदायक अस्वस्थता येते आणि त्याचा परिणाम हा बहुधा आजारपणात होतो.
(क्रमश:)
– श्रीमाताजी
(CWM 05 : 171-181)
- संपूर्ण आणि समग्र ईश्वराधीनता - February 1, 2025
- भारत हाच जगातील असा एकमेव देश आहे… - January 26, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २३२ - January 24, 2025