व्यक्ती निश्चितपणे आजारपणावर आतून कार्य करू शकते आणि तो आजार बरा करू शकते. फक्त एवढेच की, हे नेहमीच सोपे असते असे नाही. कारण जडभौतिकामध्ये खूप प्रतिरोध असतो, तो जडत्वाचा विरोध असतो. येथे अथक असे प्रयत्नसातत्य आवश्यक असते. प्रथमतः व्यक्तीला त्यात कदाचित सपशेल अपयश येईल किंवा आजाराची लक्षणे वाढतील; पण हळूहळू शरीरावरील किंवा एखाद्या विशिष्ट आजारावरील नियंत्रण दृढ होत जाईल. त्यातही, आजारपणाचा कधीतरी झालेला हल्ला असतो, तो आंतरिक साधनांनी बरा करणे तुलनेने अधिक सोपे असते; पण भविष्यातही त्या आजारापासून शरीर सुरक्षित ठेवणे हे अधिक अवघड असते.

दीर्घकालीन आजार असेल, तर तो बरा करण्यास अधिकच कठीण असतो, शरीराच्या अधूनमधून उद्भवणाऱ्या तक्रारींपेक्षा, असे जुनाट आजार शरीरातून पूर्णपणे नाहीसे होण्यास अधिक नाखूष असतात. जोवर शरीरावरील नियंत्रण हे सदोष असते, तोपर्यंत आंतरिक शक्तीच्या वापरामध्ये या सर्व व इतर अपूर्णता आणि अडचणी राहणारच. आंतरिक कार्याच्या आधारे, जरी तुम्ही आजारपण वाढू देण्यापासून रोखू शकलात, तरी पुष्कळ झाले; जोपर्यंत तुम्ही तो आजार पूर्ण बरा करण्याच्या क्षमतेचे होत नाही तोपर्यंत, ‘अभ्यासा’ने तुम्हाला ती आंतरिक शक्ती अधिक बळकट करत नेली पाहिजे. हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, जोपर्यंत ती आंतरिक शक्ती संपूर्णतया तिथे कार्यरत नसेल तोपर्यंत, भौतिक उपचारांची मदत घेणे सोडता कामा नये.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 579-580)

श्रीअरविंद