प्रश्न : तुम्ही येथे असे सांगितले आहे की, “आपण कर्मबंधनाने बांधले गेलेलो असतो,” पण जेव्हा ईश्वरी कृपा कार्य करते तेव्हा ती कर्माचा निरास करते..
श्रीमाताजी : हो पूर्णपणे, ईश्वरी कृपा कर्माचा पूर्ण निरास करते. सूर्यासमोर लोणी ठेवले तर ते कसे वितळून जाईल तसे होते.
मी आत्ता तेच सांगत होते. जर तुमच्याकडे पुरेशी प्रामाणिक अभीप्सा असेल किंवा पुरेशी तीव्र प्रार्थना असेल, तर तुम्ही तुमच्यामध्ये असे ‘काहीतरी’ खाली उतरवू शकता की, ज्यामुळे प्रत्येक गोष्टच, अगदी प्रत्येक गोष्ट बदलून जाईल. खरोखर, प्रत्येक गोष्ट बदलून जाते.
म्हटले तर, एक अगदी साधे उदाहरण देता येईल; पण त्यामुळे तुम्हाला मुद्दा नीट समजेल. दगड अगदी यांत्रिकपणे खाली पडतो; समजा एखादी फरशी सैल झालेली आहे तर ती खाली पडेल, हो ना? पण जर समजा, प्राणिक वा मानसिक निर्धार असणारी एखादी व्यक्ती तिथून जात असेल; आणि तिला असे वाटले की, ती फरशी खाली पडू नये, आणि त्या व्यक्तीने जर हात पसरले तर ती फरशी त्या व्यक्तीच्या हातावर पडेल; पण ती खाली जमिनीवर पडणार नाही. तेव्हा, त्या दगडाची वा फरशीची नियती त्या व्यक्तीने बदललेली असते. येथे वेगळ्या प्रकारच्या नियतीवादाचा प्रवेश झालेला आहे. तो दगड आता कोणाच्यातरी डोक्यात पडण्याऐवजी, तो त्या व्यक्तीच्या हातावर पडतो आणि त्यामुळे कोणाचा जीव दगावत नाही.
येथे कमीअधिक अचेतन अशा यंत्रणेमध्ये एका वेगळ्या प्रतलावरील सचेतन इच्छाशक्तीचा हस्तक्षेप घडून आलेला असतो.
– श्रीमाताजी
(CWM 05 : 90-91)
- संन्यासवाद आणि आध्यात्मिकता - December 3, 2023
- इच्छावासना आणि आध्यात्मिकता - November 30, 2023
- आध्यात्मिकता आणि नैतिकता यातील फरक - November 29, 2023