जेव्हा ज्ञानामुळे शांत झालेले, प्रेमाने काठोकाठ भरलेले हृदय परमानंदित होते आणि सामर्थ्याने स्पंदित होऊ लागते; जेव्हा शक्तीच्या सामर्थ्यशाली भुजा, विश्वासाठी आनंद आणि प्रकाशाच्या ज्योतिर्मयी पुर्णत्वामध्ये परिश्रम घेतात; जेव्हा ज्ञानाचा दीप्तिमान मेंदू, हृदयाकडून आलेल्या धूसर अंत:प्रेरणा ग्रहण करतो आणि त्या रूपांतरित करतो आणि उच्चासनस्थित अशा संकल्पशक्तीच्या कार्यासाठी स्वत:ला स्वाधीन करतो; जो जीव सर्व विश्वाच्या एकत्वामध्ये जीवन जगत असतो आणि रुपांतरित करण्याच्या भूमिकेतूनच विश्वातील सर्व गोष्टींचा स्वीकार करत असतो, अशा त्यागी जीवाच्या अधिष्ठानावर जेव्हा हे सर्व देव, एकत्रितपणे सुप्रतिष्ठित होतात; हीच ती अवस्था असते जेव्हा मनुष्य समग्रतया स्व-अतीत होतो.

… हाच तो अतिमानवत्वाकडे जाण्याचा दिव्य मार्ग !

*

अतिमानव कोण?

मनोमय मानवी अस्तित्व भंगलेले आहे हे जाणून, जो या जडभौतिकाच्या वर उठून; वैश्विकतेने स्वत:ला भारून घेतो आणि दिव्य शक्तीसामर्थ्य, दिव्य प्रेम व आनंद आणि दिव्य ज्ञान यामध्ये देवसायुज्यत्व साधतो, तोच अतिमानव !

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 157), (CWSA 12 : 439)

जे स्वत:च्या सामान्य प्रकृतीवर मात करण्यासाठी धडपडतात; दिव्य सत्याच्या संपर्कात येण्याचा जो खोलवरचा अनुभव त्यांनी घेतलेला आहे, तो जडभौतिकामध्ये प्रत्यक्षात आणण्यासाठी, जे प्रयत्नशील असतात; जे अतीत किंवा सर्वोच्चाप्रत निघून जाण्याऐवजी, स्वत:च्या अंतरंगात अनुभवास आलेले जाणिवेतील परिवर्तन भौतिकरित्या, बाह्यात उतरविण्यासाठीसुद्धा धडपडतात; ते सर्व अतिमानवतेचे उमेदवार असतात. आणि त्यांच्या या प्रयत्नांच्या यशस्वितेमध्ये अनेकानेक प्रकार आहेत.

ज्या ज्या वेळी आपण सामान्य माणूस म्हणून बनून राहण्याचे नाकारतो, सामान्य जीवन जगणे नाकारण्याचा प्रयत्न करतो; ज्या ज्या वेळी आपल्या हालचालींमधून, कृतींमधून, प्रतिक्रियांमधून आपण ते दिव्य सत्यच अभिव्यक्त करण्याचा प्रयत्न करतो; जेव्हा सार्वत्रिक अज्ञानाची सत्ता आपल्यावर चालू न देता, दिव्य सत्याने आपण शासित होतो, त्या वेळी आपण अतिमानवतेचे प्रशिक्षणार्थी असतो. आणि आपल्या प्रयत्नांच्या यशस्वितेनुसार, आपण कमी अधिक प्रमाणात सक्षम प्रशिक्षणार्थी असतो, कमी अधिक प्रमाणात या मार्गावर प्रगत झालेले असतो.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 410)

आता हे खात्रीपूर्वक ठामपणे सांगता येईल की, मनोमय जीव आणि अतिमानसिक जीव यांच्यामध्ये एक मधला दुवा असणारी प्रजाती असेल. एक अशा प्रकारचा अतिमानव असेल की ज्याच्यामध्ये मनुष्याचा स्वभाव आणि वैशिष्ट्ये काही प्रमाणात असतील; म्हणजे असे की, तो त्याच्या बाह्य रूपाच्या दृष्टीने, त्याच्या पशुसमान जन्मप्रक्रियेनिशी अगदी मानवासारखाच असेल; पण तो त्याची चेतना इतकी रूपांतरित करेल की. साक्षात्कार आणि कृती ह्या दृष्टीने तो जणू त्या नव्या वंशाचा, अतिमानसिक वंशाचा सदस्यच असेल.

अशा ह्या प्रजातीला ‘संक्रमणशील प्रजाती’ असे संबोधता येईल. एखादी व्यक्ती तिच्या भविष्यवेधी दृष्टीद्वारे हे पाहू शकते की, ही संक्रमणशील प्रजाती जन्म देण्याच्या प्राणिजगतातील जुन्या पद्धती ऐवजी, जन्म देण्याची नवीनच मार्ग शोधून काढेल. आणि मग असे खऱ्या अर्थाने आध्यात्मिकरितीने जन्माला आलेले जीव हे त्या नवीन वंशासाठी, अतिमानसिक वंशासाठी आवश्यक असणाऱ्या घटकद्रव्यांचा भाग बनतील.

म्हणजे, प्रजननाच्या जुन्याच पद्धतीने जे जन्माला आले आहेत, परंतु अतिमानसिक साक्षात्काराच्या नवीन जगताशी, जाणीवपूर्वक आणि सक्रिय असा संपर्क प्रस्थापित करण्यात जे यशस्वी झाले आहेत त्यांना आपण ‘अतिमानव’ असे म्हणू शकतो.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 313-314)

प्रकृतीमध्ये मूलतः चेतनेची उत्क्रांती आकाराला येत आहे, या पृथ्वीवर आध्यात्मिक विकसन होत आहे, हेच जर का या जडभौतिकामध्ये आपल्या (मनुष्याच्या) जन्म घेण्याचे गुप्त सत्य असेल तर, आज आहे तसा मनुष्य हा या उत्क्रांतीचा अखेरचा टप्पा असू शकणार नाही. कारण तो आत्म्याचा अगदी अपूर्ण आविष्कार आहे. आणि मनदेखील खूपच मर्यादित रूप आहे; व ते केवळ साधनभूत आहे. चेतनेची केवळ एक मधली पायरी म्हणजे मन आहे. त्यामुळेच मनोमय जीव (मनुष्य) हा केवळ संक्रमणशील जीवच असू शकतो.

आणि जर का मनुष्य अशा रीतीने स्वतःच्या मनोमयतेच्या अतीत जाण्यास अक्षम असेल तर, त्याला बाजूला सारून, अतिमानस आणि अतिमानव आविष्कृत झालेच पाहिजेत आणि त्यांनी या सृष्टीचे नेतृत्व केलेच पाहिजे.

परंतु मनाच्या अतीत असणाऱ्या अशा गोष्टीप्रत खुले होण्याची जर मनाचीच क्षमता असेल तर मग मनुष्याने स्वतःच अतिमानस आणि अतिमानत्वापर्यंत जाऊन का पोहोचू नये? किंवा किमान त्याने प्रकृतीमध्ये आविष्कृत होणारे आत्म्याचे जे महान तत्त्व आहे त्या उत्क्रांतीला आपली मनोमयता, आपला प्राण, आपले शरीर स्वाधीन का करू नये?

– श्रीअरविंद
(CWSA 21-22 : 879)

जेव्हा मनाचे या पृथ्वीवर अवतरण झाले तेव्हा, या पृथ्वीच्या वातावरणात मनाचे आविष्करण होण्याचा क्षण आणि पहिला माणूस उदयाला येण्याचा क्षण, यांच्यामध्ये लाखो वर्षांचा काळ लोटला. आता मात्र अतिमानवाचा उदय होणे, ही गोष्ट अधिक जलद घडून येईल; कारण मानवाला आता त्या गोष्टीची एक प्रकारची धूसर कल्पना आहे, तो अतिमानवाचे आगमन अपेक्षित करत आहे. त्याला अतिमानवाच्या आगमनाची एक प्रकारे जाणीव असल्याने, तो त्याची अपेक्षा बाळगून आहे. पण माकडं मात्र मानवाच्या उदयाची अपेक्षा बाळगत नव्हती, त्यांनी तसा कधी विचारही केलेला नव्हता, कारण कदाचित त्यांना जास्त विचारच करता येत नव्हता. परंतु, मानवाने मात्र अतिमानवाचा विचार केलेला आहे आणि तो त्याची वाट पाहत आहे, त्यामुळे ते आता लवकर घडून येईल. पण लवकर म्हटले तरी, कदाचित हजारो वर्षे लागतील.

ज्या व्यक्ती आंतरिक दृष्ट्या तयार झालेल्या असतात, खुल्या असतात आणि उच्चतर शक्तींच्या संपर्कात असतात, अतिमानसिक प्रकाशाशी आणि चेतनेशी, ज्या व्यक्तींचा कमी अधिक प्रमाणात थेट व्यक्तिगत संपर्क असतो, त्या व्यक्तींना पृथ्वीच्या वातावरणातील फरक जाणवतो.

ज्याप्रमाणे समधर्मी व्यक्तीच दुसऱ्या समधर्मी व्यक्तीला ओळखू शकतात, त्याप्रमाणे व्यक्तीमध्ये असलेली अतिमानसिक जाणीवच केवळ, पृथ्वीच्या वातावरणामध्ये अतिमानस कार्यरत असल्याचे जाणू शकते. या किंवा त्या कारणाने ज्यांनी अशी आकलनशक्ती विकसित केली आहे, त्यांनाच ते दिसू शकते.

पण ज्यांना, आपल्या अगदी नजीक आत असणाऱ्या आंतरिक अस्तित्वाची साधी जाणीवदेखील नाही, आणि जे त्यांचा आत्मा कसा असतो, हेसुद्धा सांगू शकत नाहीत, ते पृथ्वीच्या वातावरणातील हा फरक समजून येण्याइतपत तयार नसतात. त्यांना त्यासाठी पुष्कळ मजल मारावी लागेल. कारण ज्यांची चेतना ही कमी-अधिक प्रमाणात केवळ बाह्यवर्ती व्यक्तित्वामध्ये म्हणजे मन, प्राण आणि शरीर यांमध्येच केंद्रित झालेली असते अशा व्यक्तींना अशा कोणत्याही गोष्टींची ओळख पटण्यासाठी, अशा गोष्टींनी काही वैचित्र्यपूर्ण आणि अकल्पित रूप घेतलेले, दिसावे लागते. तेव्हा मग ते अशा गोष्टींना चमत्कार म्हणतात. परंतु, शक्तींच्या हस्तक्षेपामुळे जे सातत्याने चमत्कार घडून येतात; परिस्थितीमध्ये, व्यक्तिमत्त्वांमध्ये बदल घडून येतो आणि ज्याचा परिणाम हा दूरवर पसरलेला असतो अशाला ते चमत्कार असे संबोधत नाहीत; कारण येथे केवळ बाह्य रूप पाहिले जाते आणि ते खूपच स्वाभाविक वाटते. पण, खरे सांगायचे तर, घडणाऱ्या लहानात लहान गोष्टींकडे पाहून तुम्ही त्याचे चिंतन केलेत तर, त्या चमत्कारसदृश आहेत असे म्हणणे तुम्हाला भागच पडेल.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 126-127)

श्रीमाताजी : मी जेव्हा जपानहून परत येत होते तेव्हा एक घटना घडली. मी समुद्रामध्ये बोटीवर होते आणि असे काही घडेल अशी अपेक्षाही नव्हती. (मी माझ्या आंतरिक जीवनामध्ये व्यस्त होते, परंतु शरीराने मी बोटीवर राहात होते.) तेव्हा एकदम, एकाएकी, पाँडिचेरीपासून समुद्रामध्ये दोन मैलावर असताना, हवेतील वातावरण अचानकपणे बदलले आणि मला जाणवले की, आम्ही श्रीअरविंदांच्या प्रभावक्षेत्रामध्ये प्रवेश करत आहोत. तो अगदी भौतिक, सघन असा अनुभव होता.

पाँडिचेरीमध्ये मला ह्याच्या अगदी बरोबर उलट अनुभवसुद्धा आलेला आहे. अनेक वर्षांनंतर मी जेव्हा प्रथमच मोटरकारने बाहेर पडले होते, तेव्हाचा हा अनुभव आहे. मी त्या तलावाच्या पलीकडे थोडीशीच गेले असेन, अचानक मला वातावरणातील बदल जाणवला. इथे जी समृद्धी, ऊर्जा, प्रकाश, शक्ती होती ती अचानक सर्वच्या सर्व कमी कमी होत गेली आणि नंतर तर ती नाहीशीच झाली होती. मी तेव्हा मानसिक किंवा प्राणिक चेतनेमध्ये नव्हते तर, मी तेव्हा पूर्णपणे भौतिक चेतनेमध्ये होते. जे कोणी शारीरिक चेतनेबाबत संवेदनशील असतात त्यांना हा फरक खूप स्पष्टपणे जाणवतो. आणि मी तुम्हाला खात्री देते की, ज्याला आपण आश्रम असे म्हणतो तेथे शक्तीचे जे संघनीकरण झालेले आहे, तसे संघनीकरण शहरात किंवा परिघवर्ती गावांमध्येसुद्धा कोठेही नाहीये.

– श्रीमाताजी

अत्यंत महत्त्वाच्या, एकमेवाद्वितीय म्हणता येईल अशा काळामध्ये, या भूतलावर जीवन जगण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे; अशा वेळी उलगडू पाहणाऱ्या घटनांकडे आपण केवळ पाहत बसणार का? आपल्या स्वत:च्या व्यक्तिगत वा कौटुंबिक मर्यादांपलीकडे ज्यांचे हृदय धाव घेत आहे; ज्यांचे विचार, किरकोळ व्यक्तिगत आवडीनिवडी आणि स्थानिक आचार-संकेत यांच्या पलीकडे असणारे असे काही कवळू पाहत असतील; थोडक्यात सांगावयाचे झाले तर, ज्यांना अशी जाण आहे की, ते त्यांचे स्वत:चे, त्यांच्या कुटुंबाचे किंवा अगदी त्यांच्या देशाचेही नाहीत; तर विविध देश, मानवजात यांच्या माध्यमातून जो ईश्वर अभिव्यक्त होत आहे त्याचे ते आहेत, अशा व्यक्तींनी खरोखरच, जागे झाले पाहिजे आणि त्यांनी येऊ घातलेल्या उषेच्या आगमनासाठी, मानवाच्या भवितव्यासाठी कार्य करण्याच्या कामास लागले पाहिजे…

नित्यनिरंतर-परिपूर्ण असलेल्या आत्म्याचे प्रकटीकरण, त्याचे उलगडत जाणे ह्यामध्येच अतिमानवतेचा मार्ग दडलेला आहे. मानव स्वत:च्या आध्यात्मिकीकरणासाठी एकदा जरी संमती देईल, तरी सर्व गोष्टी बदलून जातील, सर्व गोष्टी सोप्या होऊन जातील.

जेव्हा मानवाला स्वत:ची प्रकृती सापडलेली असेल, जेव्हा तो खऱ्या अर्थाने ‘स्वयं’ झालेला असेल आणि जेव्हा असा हा आध्यात्मिक मानव, त्याच्या स्वत:च्या ह्या साक्षात्कारी जीवाच्या सत्याच्या आज्ञेचे उत्स्फूर्तपणे पालन करेल, तेव्हा आध्यात्मिक जीवनाची उच्चतर पूर्णता घडून येईल. पण ही उत्स्फूर्तता, पशुप्रमाणे उपजत किंवा अवचेतन नसेल, तर ती अंतर्ज्ञानात्मक आणि पूर्ण, समग्रतया चेतन असेल.

नव्या युगामध्ये मानवतेच्या भविष्यासाठी सर्वाधिक साहाय्य करतील अशा व्यक्ती कोण असतील? तर ह्याचे उत्तर असे की, पशुमानवाचे ज्याप्रमाणे आत्यंतिक मनोमय मानवामध्ये मोठ्या प्रमाणात रूपांतर घडून आले होते, त्याप्रमाणे सद्यस्थितीतील मानवाचे आध्यात्मिक मानवामध्ये रूपांतर होणे किंवा उत्क्रांती होणे ही मनुष्यप्राण्याची सर्वाधिक गरज आहे आणि ही आध्यात्मिक उत्क्रांती हीच नियती आहे; हे ज्यांनी ओळखलेले असेल अशा व्यक्ती, मानवतेच्या भविष्यासाठी सर्वाधिक साहाय्य करतील.

अशा व्यक्ती धर्माचे विविध प्रकार आणि त्याविषयीच्या श्रद्धा यांबाबतीत तुलनेने इतरांपेक्षा उदासीन असतील. त्यांच्या लेखी ‘आध्यात्मिक रूपांतरा’वरील श्रद्धा हीच एकमेव महत्त्वाची बाब असेल.

पण हे रूपांतर, कोणत्यातरी यंत्रणेने किंवा कोणत्यातरी बाह्य संस्थांच्या द्वारे घडून येऊ शकेल, असे समजण्याची चूक ते करणार नाहीत; तर ते प्रत्येक मनुष्याने आंतरिकरित्याच अनुभवणे आवश्यक आहे; अन्यथा ते रूपांतर वास्तवामध्ये कधीच उतरणार नाही, ह्याची त्यांना जाण असेल आणि ही गोष्ट ते कधीही विसरणार नाही.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 159, 165-166)

सद्यस्थितीमध्ये, मानवाचे जीवन हे बुद्धीने शासित केले जात आहे; मनाच्या सर्व कृती, हालचाली त्याला नेहमीच्या उपयोगाच्या अशा आहेत; निरीक्षण व अनुमान ही त्याच्या ज्ञानाची साधने आहेत; तो त्याच्या तर्कबुद्धीच्या आधारे जीवनातील निर्णय घेतो, मार्गाची निवड करतो. किंवा तो तर्कबुद्धीच्या आधारे तो तसे करतो, अशी त्याची समजूत असते.

परन्तु नवीन वंश हा मात्र अंतर्ज्ञानाने, म्हणजेच आंतरिक दिव्य कायद्याच्या थेट बोधाने शासित होईल. ही अंतर्ज्ञानशक्ती काही माणसांना खरंतर माहीत असते, आणि तिचा त्यांनी अनुभवदेखील घेतलेला असतो. ज्याप्रमाणे, मानवाच्या उदयापूर्वी जंगलातील काही ठरावीक अशा मोठ्या गोरिलांना निश्चितपणे तर्कबुद्धीची झलक दिसलेली होती, त्याप्रमाणे काही माणसांना ही अंतर्ज्ञानशक्ती माहीत असते, आणि तिचा त्यांनी अनुभवदेखील घेतलेला असतो. ज्यांनी आपला अंतरात्मा विकसित केलेला आहे, ज्यांनी आपल्या अस्तित्वाचा खरा कायदा काय, ह्याच्या शोधासाठी आपल्या ऊर्जा एकवटलेल्या आहेत, मानववंशातील अशा अगदी काही मोजक्याच व्यक्तींमध्ये अंतर्ज्ञानाची कमीअधिक शक्ती आढळते.

जेव्हा मन पूर्णपणे शांत असते, एखाद्या घासूनपुसून चकचकीत केलेल्या आरशाप्रमाणे स्वच्छ असते, वाराविरहित दिवशी असलेल्या निस्तरंग तळ्याप्रमाणे जेव्हा मन निस्तरंग असते तेव्हा, ज्याप्रमाणे, त्या पाण्यामध्ये वरून चांदण्यांचा प्रकाश पडतो, त्याप्रमाणे अतिमानवाचा, आंतरिक सत्याचा प्रकाश निश्चल मनाला उजळवून टाकतो आणि त्यातून अंतर्ज्ञानाचा उदय होतो. शांतीमधून येणारा हा आवाज ऐकण्याची ज्यांना सवय आहे, अशा व्यक्ती त्याकडे आपल्या कृतींचा प्रेरक प्रारंभ म्हणून पाहतात. जेव्हा इतर सर्वसामान्य माणसं बुद्धीच्या जटिल मार्गांवरून इतस्ततः भटकत राहतात, तेव्हा अशा व्यक्ती मात्र अंतर्ज्ञानाच्या साहाय्याने, या सरस उपजतप्रेरणेच्या साहाय्याने, जीवनाच्या वळणावळणाच्या मार्गावरून सरळ पुढे जातात; जणूकाही त्यांना सामर्थ्यवान आणि अमोघ अशा हातांकडून मार्गदर्शन मिळत असावे.

ही जी आत्ता अपवादात्मक आणि असामान्य वाटणारी अशी क्षमता आहे, ती उद्याच्या मानवासाठी, येणाऱ्या नवीन प्रजातीसाठी, नूतन वंशासाठी अगदी सर्वसामान्य आणि स्वाभाविक असेल. पण कदाचित त्याचा सातत्यपूर्ण वापर हा बौद्धिक क्षमतांना बाधक ठरू शकेल. ज्याप्रमाणे माकडाकडे असलेल्या आत्यंतिक शारीरिक क्षमता ह्या माणसांमध्ये आढळत नाहीत, त्याचप्रमाणे मानवाकडे असलेली आत्यंतिक मानसिक क्षमता, अतिमानवाने गमावलेली असेल.

आजवर मानवाने जे काही विकसित केले आहे, – अगदी त्यामध्ये, जिच्या बद्दल त्याला सार्थ आणि तरीही उगीचच अभिमान असतो अशी बुद्धीदेखील आली; – ते सारे आता त्याला पुरेसे वाटत नाही, असे जाहीर करण्याचे धाडस जेव्हा मानव करेल आणि त्याच्या अंतरंगांत असलेल्या महत्तर शक्ती खुल्या करणे, त्यांचे अनावरण करणे, त्या बाहेर काढणे, हाच जेव्हा त्याचा मोठ्यातला मोठा उद्यम होईल, तेव्हा मानवाचा अतिमानत्वाकडे जाणारा मार्ग खुला होईल.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 163-64)

(उदयाला येऊ घातलेल्या अतिमानवाच्या आगमनाच्या तयारीविषयी जपानमधील स्त्रियांसमोर, श्रीमाताजी बोलत आहेत. गर्भवती स्त्रियांनी कसा दृष्टिकोन बाळगला पाहिजे, हे त्या सांगत आहेत.)

अतिमानव जन्माला यावयाचा आहे आणि तो स्त्रीच्या उदरातूनच जन्माला येणार, हे निर्विवाद सत्य आहे; पण म्हणून या सत्याविषयी केवळ अभिमान बाळगणे पुरेसे नाही; तर त्याचा अर्थ काय, हे आपण नीट समजून घेतले पाहिजे. त्यामधून आपल्यावर काय जबाबदारी येते, ह्याचे आपल्याला भान असले पाहिजे आणि आपल्यावर जे कार्य सोपविण्यात आले आहे, ते आपण अत्यंत जीव तोडून करावयास शिकले पाहिजे.

सध्याच्या विश्वव्यापक कार्यामध्ये आपल्या वाट्याला आलेले हे सर्वाधिक महत्त्वाचे कार्य आहे. यासाठी आपण सर्वप्रथम हे जाणून घेणे गरजेचे आहे की, सद्यकालीन गोंधळाचे आणि अंधकाराचे, प्रकाश आणि सुसंवादामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची माध्यमे कोणती असतील ? आणि किमान हे ढोबळमानाने तरी जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

…एका नवीनच आध्यात्मिक प्रकाशाचे, आपल्याला आजवर अज्ञात असलेल्या कोणत्यातरी दिव्य शक्तीचे या पृथ्वीवर आविष्करण होणार आहे; ईश्वरासंबंधीचा एक सर्वस्वी नवीन विचार, या विश्वामध्ये अवतरणार आहे आणि इथे एक नवीनच आकार जन्माला येणार आहे. आणि इथेच आपण, ‘खऱ्याखुऱ्या मातृत्वाची आपली जबाबदारी’ या आपल्या आरंभीच्या मुद्द्याकडे येतो.

कारण या नवीन आकारातूनच, पृथ्वीची सद्यकालीन स्थिती परिवर्तित करण्यासाठी, सक्षम असणारी आध्यात्मिक शक्ती आविष्कृत होणार आहे. हा नवीन आकार, हे नवीन रूप एक स्त्री घडविणार नाही तर दुसरे कोण?

… ज्यांच्याविषयी आपण ऐकलेले असते, वा ज्यांच्याविषयी आपल्याला माहिती असते, अशा कितीही का थोर व्यक्ती असेनात, त्यांच्यासारख्या किंवा त्यांच्याही पेक्षा थोर, अधिक विख्यात, सिद्ध आणि प्रतिभावान अशी व्यक्ती वा मानव घडविणे हे आता पुरेसे नाही; तर, जी परमोच्च शक्यता आजवरच्या मानवाची सर्व परिमाणं आणि वैशिष्ट्य ओलांडून, अतिमानवाला जन्म देणार आहे; त्या परमोच्च शक्यतेच्या संपर्कात येण्यासाठी, आपण आपल्या मनाने, आपल्या विचाराच्या आणि इच्छेच्या सातत्यपूर्ण अभीप्सेद्वारे, धडपडले पाहिजे.

काहीतरी पूर्णत: नवीन, आजवर कल्पनाही केली नव्हती, असे काही नवेच निर्माण करण्याची एक आस या प्रकृतीला पुन्हा एकवार लागली आहे आणि तिच्यामधील ह्या आवेगालाच आपण प्रतिसाद दिला पाहिजे आणि तिचे आज्ञापालन केले पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 160-161)

श्रीमाताजी : अतिमानस चेतनेला मानवी चेतनेमध्ये प्रवेश करून, स्वत:चे आविष्करण करता येणे शक्य व्हावे, ह्यासाठी मानवी चेतनेची अपेक्षित अशी अवस्था, एक दिवस निश्चितपणे येईल. मानव वंश तयार होण्यासाठी जसा प्रचंड काळ लागला होता, त्याप्रमाणेच हा नवीन वंश तयार होण्यासाठीदेखील खूप काळ लागण्याची शक्यता आहे. आणि हे क्रमाक्रमानेच घडून येणार आहे. पण मी म्हटले होते त्याप्रमाणे, जेव्हा घडायचे असेल तेव्हा ते घडेलच… एक वेळ असते, जेव्हा हे घडून येते, जेव्हा ते अवतरण घडून येते, जेव्हा संयोजन घडून येते, जेव्हा हे तादात्म्य घडून येते. कदाचित हे निमिषार्धातही घडून येते. एक क्षण असतो, जेव्हा हे घडते. नंतर मात्र कदाचित खूप, खूप, खूप वेळ जावा लागतो. एका रात्रीमध्ये जिकडे तिकडे अतिमानव प्रकट झालेले एखाद्याला दिसू शकतील, अशी कल्पना कोणी करता कामा नये. आणि ते असे असणारही नाही. मी म्हटले त्याप्रमाणे, ज्यांनी स्वत:ला पूर्णत: झोकून दिले आहे, ज्यांनी सर्वांसाठी सर्व प्रकारचा धोका पत्करला आहे, त्यांनाच हे कळू शकेल. केवळ त्यांनाच हे समजू शकेल; जेव्हा हे घडून येईल तेव्हा ते त्यांना ज्ञात होईल.

प्रश्न : म्हणजे, इतरांना ते दिसूही शकणार नाही?

श्रीमाताजी : इतरांना त्याची साधी जाणीवसुद्धा नसेल. काय घडले आहे ते जाणून न घेता, ते त्यांचे स्वत:चे मूढ जीवन तसेच चालू ठेवतील.

– श्रीमाताजी
(CWM 07 : 328-329)