अतिमानसाचे अवतरण : एक सुवर्णदिन
(०१ जानेवारी १९६९ रोजी अतिमानस चेतनेचे पृथ्वीवर आविष्करण झाले; त्याचा प्रारंभच एक प्रकारे १९५६ साली घडलेल्या खालील प्रसंगामध्ये झाला होता. त्या दिवशी अतिमानस चेतनेने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला.)
ती २९ फेब्रुवारी १९५६ ची संध्याकाळ होती. श्रीमाताजी प्लेग्राऊंडवर उपस्थित होत्या. त्यांनी ‘Synthesis of Yoga’ मधील एक उतारा वाचून दाखविला, त्यावरील प्रश्नोत्तरांनंतर सारे ध्यानस्थ झाले. ध्यानामध्ये जे घडले त्याविषयी श्रीमाताजींनी सांगितले की, “या संध्याकाळी दिव्य अस्तित्व, अगदी सघन, मूर्त स्वरूपात तुमच्यामध्ये उपस्थित होते. मी जणू सजीव असा सुवर्णाकार धारण केला होता; या विश्वापेक्षा मी विशाल झाले होते. मी एका भल्या मोठ्या प्रचंड सुवर्णदरवाज्यासमोर उभी होते, ह्या दरवाजाने विश्वाला ईश्वरापासून अलग केले होते. मी त्या दरवाजाकडे पाहिले आणि निमिषार्धात मला जाणवले, ‘वेळ आली आहे’.माझ्या दोन्ही हातांनी मी एक भली मोठी सुवर्ण हातोडी उचलली आणि जोरात त्या दरवाजावर मारली आणि एका झटक्यात त्या दरवाजाचे तुकडेतुकडे झाले. तेव्हापासून अतिमानसाचा प्रकाश, त्याची शक्ती, त्याची चेतना यांचा लोंढा या पृथ्वीवर अखंडितपणे वाहू लागला.”
ध्यान संपल्यानंतर परत जेव्हा दिवे लागले तेव्हा बसलेले सगळे उठले आणि उठून रोजच्याप्रमाणे जाऊ लागले, जणू काही घडलेच नव्हते… श्रीमाताजी म्हणतात.”या शक्तीच्या अवतरणाची जाणीव फक्त पाच जणांनाच झाली होती, त्यावेळी त्यातील दोघं जण आश्रमात होते आणि तिघे जण बाहेर होते.”
यानंतर दोन महिन्यांनी श्रीमाताजींनी एक संदेश दिला : “हे ईश्वरा, तू संकल्प केलास आणि मी तो कृतीत उतरविला. ह्या पृथ्वीवर एक नूतन प्रकाश फाकला आहे; एक नूतन विश्व जन्माला आले आहे. ज्या गोष्टींचे वचन देण्यात आले होते त्यांची परिपूर्ती झाली आहे.”
– आधार :
(Beyond Man by Georges Van Vrekhem:317-318)
*
- प्रास्ताविक - February 15, 2026
- नैराश्यापासून सुटका – ०१ - September 19, 2025
- जीवन जगण्याचे शास्त्र – ०१ - August 14, 2025






