विचलित न होणे, स्थिर आणि सश्रद्ध असणे हा खचितच योग्य दृष्टिकोन आहे. परंतु त्याचबरोबर, श्रीमाताजी आपले जे संगोपन करत असतात त्यापासून कोणत्याही कारणास्तव विन्मुख न राहणे आणि श्रीमाताजींकडून मिळणाऱ्या साहाय्याचा स्वीकार करणे हे देखील तितकेच आवश्यक आहे. व्यक्तीने स्वत:ची अक्षमता, प्रतिसाद देण्याची अक्षमता यांविषयीच्या कल्पनांमध्ये गुंतून राहणे; स्वतःचे दोष, अपयश ह्या गोष्टी अती उगाळत राहणे आणि त्याबद्दल दुःखीकष्टी होत राहण्यास किंवा त्याविषयी लाज बाळगत राहायला मनाला संमती देणे, या गोष्टी करता कामा नयेत; कारण या सर्व कल्पना, भावना ह्या गोष्टी अंततः व्यक्तीला दुर्बल बनविण्यास कारणीभूत ठरतात.
दुःखसंकटे आली, अपयश आले, ठोकरा खाव्या लागल्या तर, अशा प्रत्येक वेळी व्यक्तीने अविचल राहून त्यांकडे पाहावयास हवे आणि त्यांचा निरास व्हावा म्हणून समचित्ततेने आणि सातत्याने ईश्वरी साहाय्यासाठी धावा करावयास हवा. परंतु उदास होणे, व्यथित होणे वा नाउमेद होणे, ह्या गोष्टींना कधीच थारा देता कामा नये.
योग हा काही सोपा मार्ग नाही आणि प्रकृतीमध्ये पूर्ण परिवर्तन ही काही एका दिवसात घडून येणारी गोष्ट नाही.
-श्रीअरविंद
(CWSA 32 : 294)
- विचारमुक्त होण्याचा मार्ग - February 12, 2025
- दोन प्रकारचे आकलन - February 11, 2025
- बुद्धीला आंतरिक प्रकाशाची आवश्यकता - February 10, 2025