साधनेची दुसरी बाजू ही प्रकृती, मन, प्राण आणि शारीरिक जीवनाशी व त्यांच्या गतिविधींशी संबंधित आहे.
येथे तत्त्व हे आहे की, प्रकृती ही आंतरिक साक्षात्काराशी मिळतीजुळती असली पाहिजे म्हणजे, व्यक्तीचे दोन विसंगत भागात विभाजन व्हायला नको. आणि यासाठी, अनेक साधना किंवा प्रक्रिया आहेत.
समर्पण साधना :
त्यातील एक साधना म्हणजे, स्वतःच्या सर्व गतिविधी ह्या ईश्वरार्पण करायच्या आणि आंतरिक मार्गदर्शनासाठी व स्वतःची प्रकृती, उच्चतर शक्तीने हाती घ्यावी म्हणून तिला साद घालायची. जर का आंतरिक आत्म-उन्मीलन झाले असेल, जर का चैत्य पुरुष पुढे आलेला असेल तर मग, फार काही अडचण येत नाही – कारण त्याबरोबरच चैत्य विवेकसुद्धा येतो. सातत्याने सूचना मिळत राहतात, आणि अंततः त्याचे शासन सुरु होते, हे शासन सर्व अपूर्णता दाखवून देते आणि शांतपणे, धीराने त्या काढूनही टाकते; त्यामुळे योग्य मानसिक व प्राणिक हालचाली घडून येतात आणि त्यातून शारीरिक जाणिवेला सुद्धा एक आकार पुनर्प्राप्त होतो.
साक्षी भावाची साधना :
दुसरी पद्धत म्हणजे मन, प्राण आणि शारीरिक अस्तित्वाच्या साऱ्या हालचालींपासून अलिप्त होऊन मागे उभे राहवयाचे आणि त्यांच्या सर्व गतिविधी म्हणजे आपल्या सद्अस्तित्वाचा एक भाग आहेत असे न मानता; भूतकाळातील कर्मामुळे आपल्यावर लादल्या गेलेल्या, व्यक्तीमधील सामान्य प्रकृतीच्या नित्य रचना आहेत असे समजायचे.
व्यक्ती यामध्ये जितक्या प्रमाणात यशस्वी होते, म्हणजे जितक्या प्रमाणात ती निर्लिप्त होते, आणि मन व त्याच्या गतिविधी ह्या म्हणजेच आपण आहोत असे मानत नाही ; प्राण व त्याच्या गतिविधी म्हणजेच आपण आहोत असे मानत नाही; शरीर व त्याच्या हालचाली म्हणजेच आपण आहोत असे मानत नाही, तेव्हा व्यक्ती शांत, स्थिर, अमर्याद, अलिप्त अशा आणि ज्यामध्ये ऊर्ध्वस्थित असणाऱ्या सद्अस्तित्वाचे प्रतिबिंब दिसत असते आणि जे त्याचे थेट प्रतिनिधी असू शकते अशा, अंतरंगात असणाऱ्या आपल्या आंतरिक अस्तित्वाविषयी म्हणजे आंतरिक मन, आंतरिक प्राण, आंतरिक शरीर यांविषयी जागृत व्हायला लागते. आणि अशा या शांत आंतरिक अस्तित्वातूनच मग, जे त्याज्य आहे त्याचा अस्वीकार व्हायला सुरुवात होते; जे राखावयास हवे आणि ज्याचे परिवर्तन करावयास हवे त्याचा स्वीकार सुरु होतो. परिपूर्णत्वाविषयीची अगदी आंतरतम अशी इच्छा उदयास येते किंवा प्रकृतीच्या परिवर्तनासाठी जे आवश्यक आहे तेच प्रत्येक पावलागणिक करता यावे म्हणून दिव्य शक्तीचा धावा करणे सुरु होते.
त्यातूनच मग आंतरतम अशा चैत्य अस्तित्वाप्रत आणि त्याच्या मार्गदर्शक प्रभावाप्रत किंवा त्याच्या थेट मार्गदर्शनाप्रत मन, प्राण व शरीर खुले होण्याची शक्यता असते. बऱ्याच व्यक्तींमध्ये, ह्या दोन्ही पद्धती एकदमच उदयास येतात आणि एकत्रितपणे कार्य करतात आणि शेवटी एकमेकींमध्ये मिसळून जातात. पण व्यक्ती यातील कोणत्याही एका पद्धतीपासूनही सुरुवात करू शकते. जी पद्धत अनुसरण्यास सोपी आहे आणि जी व्यक्तीला अगदी स्वाभाविक वाटते त्या पद्धतीने तिने सुरुवात करावी. अंततः, सर्व प्रकारच्या अडचणींमध्ये जेथे वैयक्तिक प्रयत्न खुंटतात, तेव्हा गुरुच्या मदतीचा हस्तक्षेप होऊ शकतो आणि साक्षात्कारासाठी जे आवश्यक आहे ते किंवा लगेचची जी कोणती पायरी आवश्यक आहे ती गोष्ट त्यांच्याद्वारे घडून येऊ शकते.
– श्रीअरविंद
(CWSA 29 : 06-08)
- साधना, योग आणि रूपांतरण – २५७ - February 19, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २५६ - February 18, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २५५ - February 17, 2025