वैयक्तिक प्रयत्नांवर भर :
योगसाधना करण्याच्या नेहमीच दोन पद्धती असतात – पैकी एक पद्धत म्हणजे जागरुक मनाने व प्राणाने कृती करणे. पाहणे, निरीक्षण करणे, विचार करणे आणि अमुक एक गोष्ट करावयाची किंवा नाही ते ठरविणे, ह्या गोष्टींचा यामध्ये समावेश होतो. अर्थात, त्यांच्या पाठीमागे असणाऱ्या ईश्वरी शक्तीच्या साहाय्यानेच त्या कृती केल्या जातात, त्या शक्तीला आवाहन केले जाते किंवा ती शक्ती ग्रहण केली जाते – अन्यथा फारसे काही घडू शकत नाही. परंतु तरीसुद्धा येथे वैयक्तिक प्रयत्नांवरच भर असतो आणि त्याद्वारेच ओझ्याचा बराचसा भाग उचलला जातो.

चैत्य पुरुषाचा मार्ग :
दुसरा मार्ग हा ‘चैत्य पुरुषाचा मार्ग’ आहे. यामध्ये चेतना ही ईश्वराप्रत उन्मुख होते आणि केवळ चेतना वा चैत्य पुरुषच उन्मुख होतो व तो पुढे आणण्यात येतो असे नाही तर, मन, प्राण आणि शरीर देखील ईश्वराप्रत खुले होतात आणि ते प्रकाश ग्रहण करू लागतात, त्याचा परिणाम म्हणून, काय केले पाहिजे ह्याचे आकलन होऊ लागते. जे काही करणे आवश्यक आहे, ते स्वत: ईश्वरी शक्तीच करत आहे ह्याची जाणीव होऊ लागते, ते दिसू लागते. आणि तेव्हा मग, जे दिव्य कार्य चालू आहे त्यासाठी, स्वत:च्या दक्ष व जागरुक आरोहणाच्या द्वारे त्याला आवाहन करणे; हा तो दुसरा मार्ग होय.

जोपर्यंत सर्व कृतींच्या ईश्वरी उगमाशी व्यक्ती पूर्णत: समर्पित होत नाही तोवर सहसा, या दोन पद्धतींचे संमिश्रण आढळून येते. तसे समर्पण झाल्यावर मग मात्र सर्व जबाबदारी नाहीशी होते आणि मग साधकाच्या खांद्यावर कोणतेही वैयक्तिक ओझे शिल्लक राहत नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 82-83)

श्रीअरविंद