चैत्य अस्तित्वाचा श्रीमाताजींना आलेला पहिला अनुभव त्या त्यांच्या एका निकटवर्ती शिष्याला सांगत आहेत. तो अनुभव असा – मला तो अनुभव इ.स. १९१२ साली आला. पुढील सर्व वाटचालीसाठी आधारभूत असणारा हा पहिला अनुभव आहे. परंतु ह्या अनुभवापर्यंत पोहोचायला मला संपूर्ण एक वर्ष लागले. मी खाता-पिता, उठता-बसता ‘आंतरिक अस्तित्वाशी एकत्व’ हा एकच ध्यास घेतला होता. मला दुसरे तिसरे काही नको होते. मी सतत त्याचाच विचार करत असे, आणि तेव्हाच एक मजेशीर गोष्ट घडली.
ती नववर्षाच्या आदल्या दिवशीची संध्याकाळ होती. मी संकल्प केला होता, “येत्या वर्षात हे नक्की घडलेच पाहिजे.” मी आमच्या स्टुडिओमध्ये होते. त्या स्टुडिओतून बाहेर पडल्यावर समोर अंगण होते. मी सहज म्हणून दार उघडून बाहेर आले, समोर पाहते तो मला उल्कापात होताना दिसला. असे म्हणतात की, तारा निखळून पडत असताना, तुम्ही जर मनात कोणतीही इच्छा बाळगलीत तर ती वर्षाच्या आत खरी होते, आणि मी तसेच केले. तो तारा दिसेनासा व्हायच्या आत मी म्हटले, “आंतरिक अस्तित्वाशी एकत्व..”
आणि खरोखरच, डिसेंबर महिन्याच्या आत मी आंतरिक अस्तित्वाशी एकत्व पावू शकले होते. त्या काळी, आंतरिक अस्तित्वाशी एकरूप व्हायचा मी खूप प्रयत्न करत असे. अगदी रस्त्याने चालत असतानासुद्धा तोच ध्यास असे. मी सतत एकाग्र राहण्याचा प्रयत्न करत असे..ते खूप दुःखदायक असे.. खूप त्रास होत असे. जणू काही मी बंद दरवाजापुढे बसलेली असावे असे ते भासायचे…
पण एके दिवशी मात्र, अचानक, दरवाजा उघडला गेला. आणि नंतर, ती अनुभूती काही तासच नव्हे, तर काही दिवस टिकून राहिली होती.. तो चैत्य पुरुष सर्व काही जाणतो, तोच संकल्प करतो, तोच जीवनाचे नियमन करतो…ही जाणीव झाली आणि नंतर ती जाणीव मला कधीच सोडून गेली नाही..
– श्रीमाताजी (Mothers agenda Vo13 : 0ctober 30, 1962)
- ईश्वरी कृपा – प्रस्तावना - April 10, 2022
- अमर्त्यत्वाचा शोध ४० - February 28, 2022
- अमर्त्यत्वाचा शोध २० - February 8, 2022