साधनेमध्ये होणाऱ्या प्राणिक प्रेरणांच्या भेसळीतून जेव्हा साधक मुक्त होईल आणि तो जेव्हा श्रीमाताजींप्रत साधेसुधे आणि प्रामाणिक आत्मार्पण करू शकेल, तेव्हाच त्या साधकातील चैत्य पुरुष पूर्णत: खुला होईल.
जर त्यामध्ये कोणतेही अहंकारी वळण वा प्रेरणेची अप्रामाणिकता असेल, प्राणिक मागण्यांच्या दबावाखाली येऊन जर योगसाधना केली जात असेल, किंवा पूर्णपणे वा अंशत: कोणत्यातरी आध्यात्मिक वा इतर आकांक्षा पूर्ण करण्यासाठी साधना केली जात असेल; अभिमान, प्रौढी, किंवा सत्तापिपासा, पद मिळविण्यासाठी किंवा इतरांवर प्रभाव पडावा म्हणून किंवा योगिक शक्तीच्या साहाय्याने कोणतीतरी प्राणिक इच्छा भागवण्याची उर्मी म्हणून साधना केली जात असेल तर, चैत्य (Psychic) हे मुक्त होणार नाही, किंवा ते जर मुक्त झालेच तर अंशत:च होईल किंवा कधीकधीच होईल किंवा परत बंदिस्त होऊन जाईल कारण ते प्राणिक कृतींनी झाकले जाईल; चैत्य अग्नी प्राणिक धुरामुळे घुसमटून, विझून जातो.
तसेच, जर योगसाधनेमध्ये मन अग्रस्थान घेत असेल आणि आंतरात्म्याला मागे ठेवत असेल किंवा भक्ती वा साधनेतील इतर क्रिया ह्या चैत्य रूप धारण करण्याऐवजी अधिक प्राणिक बनत असतील, तर तशीच अ-क्षमता निर्माण होते.
शुद्धता, साधीसुधी प्रामाणिकता आणि कोणत्याही ढोंगाविना वा मागणीविना, भेसळयुक्त नसलेले अनंहकारी आत्मार्पण ह्या चैत्य पुरुषाच्या पूर्ण प्रकटीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या अटी आहेत.
– श्रीअरविंद
(CWSA 30: 349)
- विचारमुक्त होण्याचा मार्ग - February 12, 2025
- दोन प्रकारचे आकलन - February 11, 2025
- बुद्धीला आंतरिक प्रकाशाची आवश्यकता - February 10, 2025