चैत्य पुरुषाला पुढे आणण्याची मान्यताप्राप्त अशी कोणतीही पद्धत नसते. ते अभीप्सेवर, श्रद्धेच्या, भक्तीच्या वाढीवर, मानसिक, प्राणिक अहंकार व त्याच्या गतिविधींची पकड कमी होण्यावर अवलंबून असते. अशा प्रकारे जर विकास होत राहिला तर, एका विवक्षित क्षणी चैत्य पुरुष आणि उर्वरित इतर प्राकृतिक घटक यांमधील पडदा पातळ पातळ होत जातो आणि तो फाटायला सुरुवात होते आणि मग चैत्य पुरुष हा अधिकाधिक दृश्य, सक्रिय बनायला लागतो आणि मग तो ताबा घेतो. कधीकधी तर तो अचानकच पुढे येऊ शकतो, परंतु या बाबतीत एकच एक असा कोणताच नियम नाही.
*
सदोदित प्रेम आणि अभीप्सा यांच्या माध्यमातून चैत्य पुरुष पुढे येतो किंवा मन व प्राण हे वरून होणाऱ्या अवतरणाने आणि शक्तीच्या कार्यामुळे सुसज्ज झाले असतील तर, तेव्हाही तो पुढे येतो.
*
हृदयामध्ये वरून होणाऱ्या गतिशील अवतरणामुळे, चैत्य पुरुष पुढे येण्यास साहाय्य होते पण हे नेहमीच आपोआप घडते असे नाही – एवढेच की, त्यामुळे चैत्य पुरुषासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते.
*
चैत्य पुरुष पुढे आणावयाचा असेल तर, स्वार्थीपणा आणि मागण्या (ज्या प्राणिक भावनांचा आधार असतात त्या) हद्दपार झाल्या पाहिजेत – किमान, त्या स्वीकारता तरी कामा नयेत.
*
भूतकाळात घडून गेलेल्या किंवा वर्तमानामध्ये घडणाऱ्या कृत्यांपासून मुक्तता करून घेण्याची आणि चैत्य व आध्यात्मिक चेतनेमध्ये जीवन जगण्याची जर एखाद्या व्यक्तीची खरीखुरी प्रामाणिक इच्छा असेल तर, भूतकाळात घडलेल्या वा वर्तमानात घडणाऱ्या कोणत्याही गोष्टी, चैत्य पुरुषाला अग्रभागी येण्यापासून रोखू शकत नाहीत.
– श्रीअरविंद
(CWSA 30 : 361)
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – १७ - September 24, 2023
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – १५ - September 22, 2023
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – १२ - September 19, 2023