सामान्यत: म्हणजे सर्वसामान्य जीवनामध्ये, व्यक्तीचा चैत्य पुरुषाशी संबंध हा जवळपास नसल्यासारखाच असतो. सर्वसामान्य जीवनामध्ये ज्याचा चैत्य पुरुषाशी जागृत संपर्क आहे, अगदी क्षणभरापुरता का असेना, पण ज्याचा असा संपर्क आहे अशी व्यक्ती लाखांमध्ये एकसुद्धा सापडत नाही.

चैत्य पुरुष हा आतून कार्य करू शकतो, पण बाह्य व्यक्तित्वाच्या दृष्टीने, ते कार्य तो इतका अदृश्यपणे आणि इतक्या नकळतपणे करतो की, जणू चैत्य पुरुष त्यांच्या दृष्टीने अस्तित्वातच नसतो. बहुतांशी उदाहरणांमध्ये, अगदी खूप मोठ्या प्रमाणावर, जवळपास सर्वच उदाहरणांमध्ये तो जणू सुप्त असतो, अजिबात सक्रिय नसतो.

स्वत:च्या चैत्य पुरुषाशी जागृत संपर्क प्रस्थापित करणे, हे एखाद्या व्यक्तीला पुष्कळ साधनेमधून आणि खूपशा चिवट प्रयत्नांमधूनच शक्य होते. स्वाभाविकपणेच, अशीही काही अपवादात्मक उदाहरणे असतात – परंतु ती खरोखरच अगदी अपवादात्मक असतात आणि ती इतकी कमी असतात की, ती हाताच्या बोटांवर मोजता येण्याजोगी असतात – जिथे चैत्य पुरुषाची पूर्णत: घडण झालेली आहे, जो मुक्त आहे, जो स्वत:चा स्वामी आहे, आणि ज्याने स्वतःचे कार्य पूर्ण करण्यासाठी मानवी देहामध्ये या पृथ्वीवर परतून यायचा निर्णय घेतलेला आहे, अशी उदाहरणे अगदीच अपवादात्मक असतात. आणि अशा उदाहरणांच्या बाबतीत, जरी त्या व्यक्तीने जाणिवपूर्वकपणे साधना केली नाही तरीही, चैत्य पुरुष इतका शक्तिशाली असू शकतो की, तो कमीअधिक जाणिवयुक्त नाते प्रस्थापित करू शकतो.

परंतु अशी उदाहरणे इतकी अद्वितीय असतात, इतकी दुर्मिळ असतात की, त्या अपवादात्मक उदाहरणांनी नियमच सिद्ध होतो. बाकी सर्वच बाबतीत, सर्वच उदाहरणांमध्ये, चैत्य पुरुषाची जाणीव होण्यासाठी खूप खूप सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता असते.

सहसा असे मानण्यात येते की, व्यक्तीला जर ते तीस वर्षात साध्य करता आले, तीस वर्ष सातत्यपूर्ण प्रयत्नांनी हं, जर ते करता आले तर ती व्यक्ती अत्यंत भाग्यवान गणली जाते. आणि जर असे घडले तर तेही लवकरच घडले, असे म्हणावे लागेल. पण हे सुद्धा इतके दुर्मिळ आहे की, एखादा लगेचच म्हणतो की, “तो कोणीतरी असामान्य माणूस दिसतोय.” जे फार मोठे योगी असतात, ज्यांनी दीक्षा घेतलेली आहे, जे कमी अधिक दिव्य जीव मानले जातात, त्यांच्याबाबतीत हे असे घडते.

– श्रीमाताजी
(CWM 07 : 269)

श्रीमाताजी