माणसामध्ये नेहमीच दोन भिन्न प्रकारच्या जाणिवा असतात, एक बहिर्वर्ती जाणीव – ज्यामध्ये तो जीवन जगत असतो आणि दुसरी आंतरिक, गुप्त जाणीव की ज्याविषयी त्याला काहीच जाण नसते. जेव्हा व्यक्ती साधना करू लागते तेव्हा, ही आंतरिक जाणीव खुली होऊ लागते आणि व्यक्ती अंतरंगामध्ये जाऊन, तेथे सर्व प्रकारचे अनुभव घेऊ शकते. व्यक्तीची साधना जसजशी प्रगत होऊ लागते तसतशी व्यक्ती आता अधिकाधिक आपल्या आंतरिक अस्तित्वामध्ये राहू लागते आणि बाह्य अस्तित्व हे अधिकाधिक पृष्ठवर्ती होत जाते.

सुरुवातीला आंतरिक जाणीव ही स्वप्नवत भासत असते आणि बाह्य जाणीव ही जाग्रत वास्तव वाटत असते.

कालांतराने ही आंतरिक जाणीव खरीखुरी वाटू लागते आणि बऱ्याच जणांना मग बाह्य जाणीव एखादे स्वप्न किंवा आभास असल्याप्रमाणे किंवा ती काहीशी उथळ व बाह्य असल्याचे जाणवते. ही आंतरिक जाणीव वा चेतना गभीर शांतीचे, प्रकाशाचे, आनंदाचे, प्रेमाचे, ईश्वराच्या जवळीकीचे किंवा ईश्वराच्या अस्तित्वाचे, विश्वमातेचे स्थान असल्याचे जाणवू लागते. तेव्हा व्यक्ती आंतरिक आणि बाह्य अशा दोन जाणिवांविषयी जागृत होऊ लागते.

बाह्य जाणीव ही आंतरिक जाणिवेच्या समकक्ष जाणिवेमध्ये परिवर्तित व्हावी आणि तिचे साधन बनावी, बाह्य जाणीव देखील शांती, प्रकाश, ईश्वरऐक्याने परिपूर्ण व्हावी ह्याविषयी व्यक्ती जागृत होऊ लागते.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 89)

श्रीअरविंद