चित्शक्ती ही दोन घटकांनी बनलेली असते; स्व व वस्तुमात्रांविषयीची जाणीव आणि शक्ती व तिचे सामर्थ्य.
सजगता ही पहिली आवश्यक गोष्ट आहे, तुम्ही वस्तुंबाबत योग्य जाणीव राखत, योग्य प्रकारे जागरुक राहिले पाहिजे, त्यांना त्यांच्यातील सत्याद्वारे जाणून घेतले पाहिजे, पण त्यासाठी केवळ जाणीव असणे पुरेसे नाही. तर ती जाणीव प्रभावी ठरण्यासाठी त्यासोबत संकल्प आणि सामर्थ्य असणे आवश्यक आहे.
कोणता बदल होणे आवश्यक आहे, काय निघून जायला हवे, त्याच्या जागी काय यायला हवे, ह्याबाबतीत कदाचित एखाद्याला पूर्ण जाणीव असू शकेल, परंतु तो बदल घडवून आणण्यास तो असमर्थ असू शकेल. किंवा दुसऱ्या एखाद्याकडे प्रचंड इच्छाशक्ती असू शकेल परंतु, योग्य जागरुकतेच्या अभावी ती इच्छाशक्ती योग्य ठिकाणी आणि योग्य रीतीने कशी वापरावयाची हे समजण्यास तो असमर्थ असू शकेल.
तुम्ही चैत्य जाणिवेमध्ये (Psychic Consciousness) असल्याचा फायदा असा की, तुमच्याकडे योग्य ती जाणीव असते आणि तुमची इच्छा ही श्रीमाताजींच्या इच्छेशी सुसंगत असल्याने, तुम्ही योग्य ते परिवर्तन घडून यावे म्हणून श्रीमाताजींच्या शक्ती-सामर्थ्याचा धावा करू शकता.
पण मन आणि प्राण यांमध्येच ज्या व्यक्ती जगत असतात, अशा व्यक्ती मात्र हे करू शकत नाहीत; अशा व्यक्तींना जास्त करून वैयक्तिक प्रयत्न करणे भाग पडते. तसेच त्यांच्यामध्ये जागरुकता व इच्छा आणि मनाचे व प्राणाचे सामर्थ्य हे विभाजित व सदोष असते; त्यामुळे केलेले कार्यही सदोष असते व ते सर्वोत्तमही असत नाही. केवळ अतिमानसामध्येच जाणीव, इच्छा वा संकल्प, शक्ती ह्या नेहमीच एकत्वाने कार्यरत असतात आणि म्हणून त्या स्वाभाविकपणेच अधिक प्रभावशाली असतात.
– श्रीअरविंद
(CWSA 28 : 24-25)
- मानसिक प्रशिक्षण - February 13, 2025
- विचारमुक्त होण्याचा मार्ग - February 12, 2025
- दोन प्रकारचे आकलन - February 11, 2025