प्रश्न : आध्यात्मिक मार्ग अनुसरण्यासाठी एखाद्या व्यक्तीची तयारी झाली आहे का, हे ओळखण्याची काही लक्षणे आहेत का? विशेषेकरून, जेव्हा त्या व्यक्तीला आध्यात्मिक गुरु लाभलेला नसतो तेव्हा?

श्रीमाताजी : सर्वात महत्त्वाचे लक्षण म्हणजे, कोणत्याही परिस्थितीमध्ये जीवाची पूर्ण समता. हा अगदी निरपवादपणे अटळ असा पाया आहे; शांत, स्थिर, महान शक्तीची एक प्रकारची भावना. हा शांतपणा म्हणजे जडपणातून आलेला शांतपणा नव्हे तर, परिस्थिती कोणतीही का असेना, अगदी तुमच्या आयुष्यातील सर्वात भयंकर अशी परिस्थिती का असेना त्यावेळीदेखील एकाग्र अशा शक्तीमुळे येणारी शांतीची संवेदना.

दुसरे लक्षण म्हणजे तुमच्या सामान्य, साधारण अशा चेतनेमध्ये तुम्ही पूर्णत: बंदिवान झालेला आहात; प्रचंड कठीण, काहीतरी गुदमरवून टाकणारे, दुःसह, अशा कशामध्ये तरी तुम्ही बंदिवान झाला आहात असे तुम्हाला वाटते; जणू काही एखाद्या अभेद्य अशा भिंतीमधून तुम्हाला भोक पाडावयाचे आहे, असे तुम्हाला वाटते. आणि या यातना असह्य होतात, त्या घुसमटवणाऱ्या असतात. त्या यातना भेदून पलीकडे जाण्याचे आंतरिक प्रयत्न चालू असतात पण त्यांना भेदणे तुम्हाला जमत नाही. हे सुद्धा सुरुवातीच्या काही लक्षणांपैकी एक लक्षण आहे. ह्याचा अर्थ असा की, तुमची आंतरिक जाणीव अशा एका बिंदूपाशी येऊन पोहोचली आहे की, आता तिचा बाह्य साचा हा तिच्यासाठी खूपच तोकडा पडत आहे. सामान्य जीवन, सामान्य उद्योग, सामान्य नाती, ह्या साऱ्या साऱ्या गोष्टी इतक्या लहान, इतक्या क्षुद्र वाटू लागतात की, त्या तोडून टाकण्यासाठी एक शक्ती तुम्हाला आतूनच जाणवू लागते.

अजून एक लक्षण आहे, ते असे की, जेव्हा तुम्ही एकाग्र होता, तुमच्या मध्ये अभीप्सा उदित होते, तुम्हाला वरून काहीतरी खाली अवतरित होत आहे, तुम्हाला काही उत्तर मिळत आहे असे जाणवते. एक प्रकाश, एक शांती, एक शक्ती तुमच्या मध्ये अवतरित होत आहे असे तुम्हाला जाणवते आणि तेही अगदी त्वरित – तुम्हाला त्याच्यासाठी खूप वेळ घालवावा लागत नाही किंवा वाट पाहावी लागत नाही – आतून एक अभीप्सा उदित होते, एक हाक येते आणि लगेचच त्याला उत्तर, प्रतिसाद मिळतो. ह्यावरूनही हे लक्षात येते की, एक ‘नाते’ चांगल्या रीतीने प्रस्थापित झालेले आहे.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 97-98)