प्रश्न : आध्यात्मिक अनुभव यावेत अशी आकांक्षा आपण बाळगली पाहिजे का?
श्रीमाताजी : आध्यात्मिक अनुभव यावेत अशी आकांक्षा बाळगण्यापेक्षा, प्रगतीची आस बाळगणे किंवा अधिक जागृत होण्याविषयी आस बाळगणे किंवा चांगले काही करावे, चांगले बनावे अशी आकांक्षा बाळगणे अधिक सुज्ञपणाचे आहे.
कारण आध्यात्मिक अनुभव यावेत अशी आकांक्षा बाळगण्यातून कमीअधिक काल्पनिक आणि भ्रामक अनुभवांची दारे उघडू शकतात, उच्च गोष्टींचे रूप धारण करणाऱ्या प्राणिक कृतींची दारे उघडू शकतात. त्याद्वारे व्यक्ती स्वत:चीच फसवणूक करून घेऊ शकते.
वस्तुत: आध्यात्मिक अनुभव हे सहजस्फूर्तपणे यावयास हवेत, आंतरिक प्रगतीचा परिणाम म्हणून यावयास हवेत, पण केवळ अनुभवासाठी अनुभव अशा पद्धतीने ते यावयास नकोत.
*
आध्यात्मिक अनुभव म्हणजे स्वत:मधील किंवा बाहेरील, ईश्वराच्या संपर्कात येणे. हा अनुभव सर्व देशांमध्ये, सर्व माणसांमध्ये, सर्व काळामध्ये सारखाच असतो.
जर तुम्ही ईश्वराला भेटलात तर ईश्वर तुम्हाला नेहमीच सर्वत्र सारख्याच प्रकारे भेटतो. परंतु फरक पडत असेल तर त्याचे कारण असे की, आलेला अनुभव आणि त्याची शब्दांत मांडणी यामध्ये एक खोल दरी असते. तुमच्या आंतरिक चेतनेमध्ये तुम्हाला प्रत्यक्ष आध्यात्मिक अनुभव येतो आणि तो तुमच्या बाह्य चेतनेमध्ये शब्दांकित होतो. तुमचे शिक्षण, तुमची श्रद्धा, तुमच्या मानसिक वृत्तीप्रवृती यानुसार तो शब्दांकित होतो.
केवळ एकच सत्य, एकच वास्तव अस्तित्वात आहे, पण ते सत्य, ते वास्तव ज्या रूपांमधून अभिव्यक्त होते ती रूपे अनंत आहेत.
– श्रीमाताजी
(CWM 06 : 432) (CWM 03 : 17)
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – १४ - September 21, 2023
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – १३ - September 20, 2023
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – ११ - September 18, 2023