समाजजीवनात धर्माची आवश्यकता असते, कारण सामूहिक अहंकारावर उपाय म्हणून धर्माचा उपयोग होतो, या नियंत्रणाविना हा सामूहिक अहंकार प्रमाणाबाहेर वाढू शकतो.
व्यक्तीच्या चेतनेच्या पातळीपेक्षा सामूहिक चेतनेची पातळी नेहमीच निम्न असते, हे लक्षात येण्याजोगे आहे. उदा. जेव्हा माणसं मोठ्या संख्येने एखाद्या गटात एकत्रित येतात तेव्हा त्यांच्या चेतनेची पातळी खूप घसरते. जमावाची चेतना ही व्यक्ती-चेतनेपेक्षा खालच्या स्तरावरची असते आणि समाजाची सामूहिक चेतना ही, ज्या व्यक्तींनी तो समाज बनलेला आहे त्या व्यक्तींच्या चेतनेपेक्षा खचितच खालच्या पातळीवरची असते. त्यासाठी धर्माची आवश्यकता आहे. सामान्य जीवनात, व्यक्तीला त्याची जाणीव असो वा नसो, तिला नेहमीच एक धर्म असतो, कधीकधी ह्या धर्माचे उद्दिष्ट अगदी कनिष्ठ प्रकारचे देखील असू शकते….
ती व्यक्ती ज्या देवाची पूजा करते ती यशाची देवता असेल, पैशाची देवता असेल, सत्तेची देवता असेल, किंवा अगदी कुलदेवता असेल, मुलाबाळांची देवता, कुटुंबाची किंवा कुळाची देवता, पूर्वजांची देवता असू शकेल.
धर्म हा नेहमीच अस्तित्वात असतो. प्रत्येक व्यक्तीगणिक त्या धर्माचा दर्जा वेगवेगळा असेल, पण अस्तित्वाचा केंद्रबिंदू असणाऱ्या कोणत्याही मूलभूत आदर्शाविना नुसतेच जीवन जगत राहणे हे माणसाला कठीण असते. बऱ्याचदा त्याला त्याच्या आदर्शाची जाणही नसते आणि जर त्याला विचारले की, तुझा आदर्श काय तर तो शब्दांतदेखील सांगू शकणार नाही, पण त्याचा काही एक धर्म असतो, भले तो अस्पष्ट, धूसर असेल, पण त्याच्या जीवनाच्या दृष्टीने ती खूप मोलाची गोष्ट असते.
बहुतांशी लोकांसाठी ते एक प्रकारचे संरक्षण असते. व्यक्तीला त्यामुळे जगण्यासाठी सुरक्षित वाटेल अशी परिस्थिती प्राप्त होते. त्याच्या दृष्टीने ते फार मोठे ध्येय असते. मानवी प्रयत्नांमागची ती एक मोठी प्रेरणा असते असेही म्हणता येईल. काही लोकांसाठी समाधान ही मोठी गोष्ट असते, तर काही जणांसाठी मौजमजा, चैन ही गोष्ट मोठी असते.
ह्या गोष्टी खरंतर खूप निम्न स्तरावरच्या आहेत आणि त्याला एका ध्येयाचे नाव देण्याची इच्छाही होत नाही, पण त्या गोष्टी धर्माची रूपे आहेत; त्या गोष्टी म्हणजे असे काहीतरी होय की ज्यासाठी व्यक्तीला आपले संपूर्ण जीवन खर्ची घालावे असे वाटू शकते…. आधार म्हणून अशा गोष्टींचा वापर करून, अनेक गोष्टी मानवावर आपला प्रभाव टाकण्याची धडपड करीत असतात. माणसांमधील असुरक्षिततेची भावना, अनिश्चिततेची भावना ह्याच गोष्टींचा वापर करून, राजकीय किंवा धार्मिक समूह त्यांच्यावर प्रभाव टाकू पाहतात. ते या भावनांशी खेळू पाहतात. प्रत्येक राजकीय वा सामाजिक संकल्पना ही एखाद्या धर्माच्या मूलभूत आदर्शाची भ्रष्ट अशी अभिव्यक्ती असते. व्यक्तीमध्ये एकदा का विचाराची शक्ती आली की, तेथे ताबडतोब क्षणोक्षणीच्या ह्या अगदी पशुवत अशा दैनंदिन जीवनापेक्षा, काहीतरी उच्चतर अशी आकांक्षा अपरिहार्यपणे त्याच्यामध्ये उदय पावते; आणि त्यातूनच त्याला जगण्याची उमेद आणि ऊर्जा प्राप्त होते. पण फारच थोडी माणसं स्वतंत्रपणे विचार करू शकतात, अशा वेळी त्यांनी स्वत:साठी स्वत:चाच एखादा वेगळा पंथ काढण्यापेक्षा, कोणत्यातरी धर्माचा स्वीकार करणे, त्यामध्ये सहभागी होणे, आणि त्या धार्मिक सामूहिकतेचा एक भाग बनणे हे अधिक सुकर असते. त्यामुळे वरवर पाहता, एखादी व्यक्ती ह्या धर्माची वा त्या धर्माची असते, पण हे फक्त वरवरचे भेद असतात.
– श्रीमाताजी
(CWM 09 : 354-356)
- संपूर्ण आणि समग्र ईश्वराधीनता - February 1, 2025
- भारत हाच जगातील असा एकमेव देश आहे… - January 26, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २३२ - January 24, 2025