पाश्चिमात्य मनाच्या दृष्टीने, नीति ही बाह्य वर्तनाची गोष्ट आहे; भारतीय मनाच्या दृष्टीने मात्र, बाह्य वर्तन हे आत्मावस्थेच्या अभिव्यक्तीचे केवळ एक साधन आहे, ते आत्मावस्थेचे केवळ एक लक्षण आहे. पालन करण्यासाठी हिंदुधर्माने नैतिक नियमांचा तक्ता, काही आदेश कधीकधी जरुर एकत्रित केलेले आढळतात, पण अधिक भर दिलेला आहे तो मनाच्या आत्मिक, नैतिक शुद्धीवर; येथे वर्तन, कृति ही केवळ आंतरिक शुद्धीचे बाह्य लक्षण आहे असे सांगितले जाते; येथे “तू हिंसा करू नकोस” असे जोरकसपणे सांगितले जाते, खूप स्पष्टपणे सांगितले जाते, पण त्याहून अधिक ठामपणे अशा एका आदेशावर भर दिला जातो की, “तू कोणाचाही द्वेष करू नकोस; लोभ, क्रोध, मत्सर या विकारांना बळी पडू नकोस.” कारण हिंसेचे मूळ या द्वेषादि विकारातच असते.
आणखी एक गोष्ट अशी की, हिंदुधर्मात सापेक्ष आदर्श मान्य करण्यात आले आहेत. परंतु युरोपीय बुद्धीला हे शहाणपण झेपणारे नाही. हिंदुधर्मात सर्वात श्रेष्ठ नियम अहिंसा हा आहे – ‘अहिंसा परमो धर्मः’ तथापि योद्ध्यासाठी मात्र हा नियम ठेवलेला नाही; शारीरिक अहिंसा त्याच्या कर्तव्यात बसत नाही; मात्र योद्ध्याने न लढणारे लोक व दुबळे, नि:शस्त्र, पराभूत झालेले लोक, कैदी, जखमी, पळणारे लोक यांजबददल दया, दाक्षिण्य व समानबुद्धी दाखवलीच पाहिजे असे हिंदुधर्म आग्रहाने सांगतो. याप्रमाणे सर्वांना एकच पूर्ण निरपवाद नियम ठेवण्यात जी अव्यावहारिकता असते, ती अव्यावहारिकता हिंदुधर्म टाळतो.
– श्रीअरविंद
(CWSA 20 : 149)
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – २२ - September 29, 2023
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – २१ - September 28, 2023
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – २० - September 27, 2023