धर्म ह्या शब्दाला नैतिक व व्यावहारिक, नैसर्गिक व तत्त्वज्ञानात्मक आणि धार्मिक व आध्यात्मिक असे अर्थ आहेत; तसेच, हा शब्द वरील अर्थांपैकी केवळ एकाच अर्थाने, जसे की केवळ नैतिक अर्थाने, केवळ तात्विक अर्थाने किंवा केवळ धार्मिक अर्थानेदेखील वापरला जाऊ शकतो.
उदा. नैतिक दृष्टीने पाहिले असता, ‘सद्वर्तनाचा, नीतिमान वर्तनाचा नियम’ असा धर्म या शब्दाचा अर्थ होतो; किंवा अधिक बाह्य व व्यावहारिक दृष्टीने पाहिले असता, ‘सामाजिक आणि राजकीय न्याय’ किंवा ‘फक्त सामाजिक नियमांचे पालन’ असा धर्म या शब्दाचा अर्थ होतो.
धर्माच्या भारतीय संकल्पनेत केवळ चांगले, योग्य, नैतिक, न्याय्य या बाबींचाच समावेश होतो असे नाही. दिव्य तत्त्वाच्या अंगाने विचार करता, माणसाचे इतर जीवांशी, निसर्गाशी, ईश्वराशी जे सर्व नातेसंबंध असतात, त्या साऱ्यांचे नियमन करणारा धर्म असतो. दिव्य तत्त्वाची अभिव्यक्ती विविध रूपांद्वारे, आंतरिक व बाह्य जीवनाच्या रूपांद्वारे, कृतीच्या कायद्यांच्या माध्यमातून होत असते. जगातील या सर्व प्रकारच्या नातेसंबंधांची सुव्यवस्था लावण्याचे कामदेखील धर्म करीत असतो.
धर्म हा शब्द दोन्ही अर्थाने घेता येतो – एक म्हणजे आपण ज्याला धरून राहतो तो धर्म आणि दुसरा अर्थ आपल्या आंतरिक व बाह्य कृतींची जो धारणा करतो तो धर्म !
धर्म शब्दाचा मूळ अर्थ, आमच्या प्रकृतीचा मूलभूत, पायाभूत नियम; आमच्या सर्व क्रियांचा गुप्त आधार व आलंबन असणारा आमच्या प्रकृतीचा पायाभूत नियम असा आहे. या अर्थाने प्रत्येक भूतमात्राला, प्रत्येक जीवप्रकाराला, जीवजातीला, व्यक्तीला, समूहाला त्याचा त्याचा धर्म असतो.
धर्माचा दुसरा अर्थ, आमच्यात जी दिव्य प्रकृती विकसित व व्यक्त व्हावयाची असते ती, ज्या आंतरिक व्यापारांनी आम्हामध्ये विकसित होते, त्या व्यापारांचा नियम असा आहे.
धर्म म्हणजे असा कायदा होय की, ज्यायोगे आमचे बाह्य विचार, कृती व आमचे परस्परांशी असलेले सर्व संबंध यांचे नियमन केले जाते. ह्या नियमनामुळे दिव्य आदर्शाच्या दिशेने आमचा स्वत:चा विकास आणि आमच्या मानववंशाचा विकास होण्यास साहाय्य होते.
धर्म न बदलणारा असतो, शाश्वत असतो असे सामान्यत: म्हणण्यात येते. धर्माचे मूलतत्त्व, धर्माचा आदर्श ही शाश्वत आणि अपरिवर्तनीय वस्तु आहे हे खरे आहे; पण धर्माचे विशिष्ट विचार व आचार नित्य बदलणारे, नित्य विकास पावणारे असतात. कारण, अद्यापि मानवाला आदर्श धर्म सापडलेला नाही किंवा मानव अद्यापि आदर्श धर्माला धरून वागत नाही, ही वस्तुस्थिती आहे. अशा आदर्श धर्माच्या प्राप्तीसाठी मानव कमीअधिक पूर्णतेने तळमळत आहे, धडपडत आहे. अशा आदर्श धर्माचे त्याला अधिकाधिक ज्ञान होत आहे व तो अशा धर्माचे आचरण अधिकाधिक प्रमाणात पसंत करू लागला आहे.
– श्रीअरविंद
(CWSA 19 : 171-172)
- रूपांतरण हे उद्दिष्ट - May 27, 2022
- त्रिविध तपस्या - May 26, 2022
- आत्म-प्राप्ती हेच रहस्य - May 17, 2022