बाळाची संकल्पपूर्वक गर्भधारणा ही अतिशय दुर्मीळ अशी बाब आहे. अगणित पालकांमधील अगदी थोडेच पालक असे असतात की ज्यांना बाळ कसे असावे याची थोडीतरी पर्वा असते, अनेकांना हे देखील माहीत नसते की ते जसे आहेत त्यावर बाळ कसे असणार हे अवलंबून आहे. काही थोड्या अभिजनांनाच हे माहीत असते. बऱ्याचदा गोष्टी जशा घडू शकतात तशा घडतात, काहीही होऊ शकते आणि काय घडत आहे ह्याची लोकांना जाणीवच नसते. तेव्हा अशा परिस्थितीत तुम्हाला साहाय्यक ठरेल अशा तऱ्हेचा पुरेसा विशुद्ध असा प्राणिक जीव जन्माला येईल अशी अपेक्षा तुम्ही कशी बाळगू शकता? व्यक्ती जन्माला येताना मृत त्वचा घेऊनच जन्माला आलेली असते, ती स्वच्छ केल्याशिवाय तिला जगण्याची सुरुवातच करता येत नाही.
एकदा का तुम्ही आंतरिक रुपांतरणाच्या दृष्टीने चांगला प्रारंभ केला आणि जर तुम्ही जीवाच्या मुळाशी अवचेतनेपर्यंत प्रवास केला तर – जे तुमच्यामध्ये तुमच्या पालकांकडून, अनुवंशिकतेतून आलेले असते – ते तुम्हाला दिसू लागते. बहुतांशी या सर्वच अडचणी तेथे आधीपासूनच असतात, जन्मानंतरच्या पहिल्या काही वर्षांमध्ये ज्यांची भर पडते अशा गोष्टी फारच थोड्या असतात. आणि अशा गोष्टी कोणत्याही आकस्मिक क्षणीदेखील घडू शकतात; जर तुम्ही वाईट संगतीमध्ये राहिलात, वाईट पुस्तके वाचलीत, तर ते विष तुमच्यामध्ये शिरेल; अशावेळी या गोष्टींचे अवचेतनामध्ये खोलवर उमटलेले ठसे आणि तुमच्या वाईट सवयी यांच्या विरुद्ध तुम्हाला झगडावे लागते.
उदाहरणार्थ, असे काही लोक असतात की ज्यांना खोटे बोलल्याशिवाय तोंडच उघडता येत नाही; ते नेहमीच तसे जाणीवपूर्वक करतात असेही नाही (ते जास्तच घातक आहे.) किंवा असे काही लोक असतात की जे इतरांच्या संपर्कात आले की भांडल्याशिवाय राहूच शकत नाहीत, अशा गोष्टी त्यांच्या अवचेतनेमध्ये खोलवर रुजलेल्या असतात.
जेव्हा तुम्ही चांगली इच्छा बाळगता, तेव्हा बाह्यत: तुम्ही या सर्व गोष्टी टाळण्याचा, शक्य असेल तर त्या दुरुस्त करण्याचा हरप्रकारे प्रयत्न करता, त्यावर तुम्ही काम करता, त्यांच्याशी मुकाबला करता; आणि मग तुम्हाला अशी जाणीव होते की या गोष्टी सारख्या सारख्या वर येत आहेत, जो भाग तुमच्या नियंत्रणावाचून सुटलेला आहे अशा भागातून त्या वर येत आहेत.
पण जर का तुम्ही तुमच्या अवचेतनेमध्ये प्रवेश केलात, तुमच्या चेतनेला त्यामध्ये प्रवेश करू दिलात आणि काळजीपूर्वक पाहू लागलात तर मग तुम्हाला हळूहळू तुमच्या अडचणींचे मूळ, उगम कोठे आहे त्याचा शोध लागतो; तुमचे आईवडील, आजी आजोबा कसे होते हे तुम्हाला कळू लागते आणि एखाद्या विशिष्ट घडीला तुम्ही स्वत:वर ताबा मिळवू शकत नाही तेव्हा तुम्हाला कळते, ”मी असा आहे कारण ते तसे होते.”
तुमच्या कडे लक्ष ठेवून असणारा, तुमची मार्गावर तयारी करून घेणारा असा पुरेसा जागृत चैत्य पुरुष जर तुमच्यामध्ये असेल तर तो तुमच्याकडे तुम्हाला साहाय्यक ठरतील अशा गोष्टी, माणसे, पुस्तके, परिस्थिती खेचून आणू शकतो. कोणा परोपकारी, कृपाळू इच्छेमुळेच जणू घडले असावेत असे छोटे छोटे योगायोग घडून येतात आणि तुम्हाला काही सूचना, काही मदत, निर्णय घेण्यासाठी काही आधार पुरविण्यात येतात आणि तुम्ही योग्य दिशेला वळवितात.
पण एकदा का तुम्ही निर्णय घेतला, तुमच्या जीवाचे सत्य शोधून काढायचे एकदा का तुम्ही ठरविलेत, तुम्ही त्या मार्गावरून प्रामाणिकपणे वाटचाल करावयास सुरुवात केली तर, तुमच्या प्रगतीसाठी मदत व्हावी म्हणून जणू कोणीतरी संगनमताने सारे घडवीत आहे असे वाटू लागते.
आणि जर तुम्ही काळजीपूर्वक निरीक्षण केलेत तर हळूहळू तुम्हाला तुमच्या अडचणींचे मूळ दिसू लागते : “ओह! हा दोष माझ्या वडिलांमध्ये होता तर, अरेच्चा, ही तर माझ्या आईची सवय आहे; खरंच, माझी आजी अशी होती, माझे आजोबाही असे होते.” असे तुम्हाला जाणवू लागते. किंवा मग तुम्ही लहान असताना जिने तुमची काळजी घेतली होती अशी कोणी तुमची आया असेल, किंवा तुम्ही ज्यांच्याबरोबर खेळलात, बागडलात ती तुमची बहीणभावंडे असतील, तुमचे मित्रमैत्रिणी असतील, यांच्यात किंवा त्यांच्यात काहीतरी असलेले तुम्हाला तुमच्यामध्ये सापडेल.
पण जर तुम्ही प्रामाणिक राहिलात तर या सगळ्या गोष्टी तुम्ही शांतपणे पार करू शकाल, असे तुम्हाला आढळून येईल. आणि कालांतराने ज्या बंधांनिशी तुम्ही जन्माला आला होतात ते सारे बंध, त्या साऱ्या साखळ्या तुम्ही तोडाल आणि तुमच्या मार्गावर अगदी मुक्तपणे पुढे जाल.
जर तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्त्व बदलायचे असेल तर तुम्ही हे केलेच पाहिजे. नेहमीच असे सांगितले जाते की एखाद्याची प्रकृती बदलणे अशक्य आहे; सर्व तत्त्वज्ञानाची पुस्तके, अगदी योग सुद्धा असेच सांगतो, तुम्हाला असेच सांगितले जाते की “तुम्ही तुमची प्रकृती बदलू शकत नाही कारण तुमच्या जन्माबरोबरच ती आलेली असते, तुम्ही तसेच आहात.”
पण हे पूर्णपणे चुकीचे आहे, मी खात्रीपूर्वक सांगू शकते की हे खोटे आहे. पण तुमची प्रकृती, तुमचा स्वभाव बदलण्यासाठी खूप अवघड गोष्ट करावी लागते. तुम्हाला तुमची प्रकृती केवळ बदलावयाची नसते तर तुमच्या पूर्वजांची प्रकृती बदलावयची असते. तुम्ही त्यांच्यामध्ये बदल घडवून आणू शकत नाही कारण त्यांचा तसा कोणताही हेतू नसतो, पण तुम्हाला तुमच्यामध्ये ती बदलावयाची असते.
त्या गोष्टी ज्या त्यांनी तुम्हाला दिलेल्या असतात, तुमच्या जन्माबरोबर जणू या छोट्या भेटवस्तूच तुम्हाला मिळालेल्या असतात – त्या बदलावयाच्या असतात. या गोष्टींचा मूळ, खरा धागा मिळविण्यात जर का तुम्ही यशस्वी झालात, आणि जर तुम्ही त्यावर चिकाटीने आणि प्रामाणिकपणे काम केलेत तर एखाद्या अवचित क्षणी तुम्ही त्यापासून मुक्त व्हाल; ते सारे काही तुमच्यापासून गळून पडलेले असेल आणि तुम्ही कोणत्याही ओझ्याविना एका नवीन जीवनाची सुरुवात करण्यास सक्षम झालेले असाल.
तेव्हा तुम्ही कोणी एक नवीनच व्यक्ती असाल, एका नवीन स्वभावाने, नवीन प्रकृतीनिशी एक नवीन जीवन जगत असाल. आणि जर तुम्ही मागे वळून पाहिलेत तर तुम्ही म्हणाल, ”हे शक्य नाही, मी असा कधीच नव्हतो.”
– श्रीमाताजी
(CWM 04 : 260-262)
- संपूर्ण आणि समग्र ईश्वराधीनता - February 1, 2025
- भारत हाच जगातील असा एकमेव देश आहे… - January 26, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २३२ - January 24, 2025