परिपूर्ण झालेले प्रेम ज्ञानाला वगळत नाही तर, उलट तेच प्रेम स्वत: ज्ञान मिळवून देते आणि ज्ञान जेवढ्या प्रमाणात पूर्ण असते तेवढ्या प्रमाणात प्रेमाची शक्यता अधिकाधिक समृद्ध होते…
भगवद्गीतेमध्ये भगवंत असे सांगतात की, ”भक्तीमुळे एखादा भक्त ‘मला’ माझ्या सर्व प्रमाणात आणि माझ्या महानतेनिशी जाणू शकतो आणि तो जर याप्रमाणे ‘मला’ माझ्या अस्तित्वाच्या तत्त्वानिशी जाणेल तर, तेव्हा तो माझ्यामध्ये सामावू शकेल.”
प्रेम हे जर ज्ञानविरहीत असेल तर, ते तीव्र व जोरदारही असू शकेल; पण ते आंधळे, ग्राम्य, आणि बव्हंशी वेळा भयंकरही असू शकेल. हे ज्ञानविरहीत प्रेम ही मोठी ताकद असू शकते, परंतु ते खूप मोठी धोंडसुद्धा ठरू शकते; प्रेम ज्ञानदृष्ट्या सीमित असेल तर उत्साहाच्या भरात, संकुचितपणाच्या जोशात ते स्वत:चीच अवहेलना करते, परंतु, पूर्ण ज्ञानाभिमुख झालेले प्रेम हे ईश्वराशी अमर्याद आणि संपूर्ण ऐक्य घडवून आणते.
असे प्रेम कर्माशी फारकत घेत नाही, उलट ते दिव्य कर्मामध्ये स्वत:ला आनंदाने झोकून देते. कारण ते ईश्वरावर प्रेम करीत असते आणि त्याच्या सर्व अस्तित्वाशी व त्यामुळे, सर्व जीवामात्रांमधील ईश्वराशी ते एकरूप झालेले असते; आणि त्यामुळे अशा प्रेमाला, जगाकरता काम करणे हा, विविधतेने नटलेल्या ईश्वरावर प्रेम करण्याचा आणि त्याची परिपूर्तता करण्याचा मार्ग वाटतो.
अशाप्रकारे भक्तीच्या, प्रेमाच्या मार्गाने आपण प्रवासाला आरंभ केला की, आपल्या त्रिविध शक्ती (प्रेमशक्ती, ज्ञानशक्ती व कर्म-संकल्पशक्ती) ईश्वराच्या ठिकाणी ऐक्य पावतात; ह्या मार्गाच्या देवदूताला, (All-Lover’s being) ‘सर्व-प्रेममया’च्या अस्तित्वाच्या दिव्य आनंदाचा परमानंद लाभणे ही आपली परिपूर्ती वाटते; त्याला ते त्याचे सुरक्षित धाम वाटते; त्याला ते शाश्वत स्थान वाटते आणि तेच वैश्विक किरणोत्सर्गाचे केंद्रस्थान वाटते.
– श्रीअरविंद
(CWSA 24 : 547)
- रूपांतरण हे उद्दिष्ट - May 27, 2022
- त्रिविध तपस्या - May 26, 2022
- आत्म-प्राप्ती हेच रहस्य - May 17, 2022