आम्ही जो ईश्वर पूजतो तो केवळ दूरची विश्वातीत वस्तू नाही, तर तो अर्धवट झाकलेला प्रकट ईश्वर आहे; तो आमच्याजवळ, या आमच्या जगात येथे आत्ता उपस्थित आहे.

जीवन हे ईश्वराच्या अभिव्यक्तीचे असे क्षेत्र आहे की, जे अजून पूर्णतेस गेलेले नाही. येथे जीवनात, पृथ्वीवर, या शरीरात – ‘इहैव’ असा उपनिषदांचा आग्रह आहे – आम्हाला ईश्वरावरील पडदा दूर करून त्याला प्रकट करावयाचे आहे. त्याचा सर्वातीत मोठेपणा, प्रकाश आणि माधुर्य या गोष्टी आमच्या जाणिवेला येथे वास्तव वाटतील असे करावयाचे आहे. तो आम्हाला आमच्या जाणिवेत आमचा म्हणून आणावयाचा आहे आणि त्या प्रमाणात व्यक्त करावयाचा आहे.

सर्वथा परिवर्तित करता यावे यासाठी आम्ही जीवन, आज जसे आहे तसे स्वीकारावयाचे आहे; असा स्वीकार केल्याने आमच्या संघर्षामध्ये अधिक भर पडेल; पण त्या संघर्षापासून, अडचणींपासून पळ काढण्यास आम्हाला मनाई आहे.

या अडचणीमुळे आम्हाला जे विशेष परिश्रम होतात त्या परिश्रमांची खास भरपाई आम्हाला पुढे लाभते, ही त्यात समाधानाची गोष्ट आहे. आमचा पूर्णयोगाचा मार्ग वाकडातिकडा व खडकाळ असतो आणि मार्ग चालण्याचे परिश्रम नको इतके त्रासदायक व गोंधळ उडवणारे असतात.

तरीपण काही मार्ग चालून झाल्यावर, आमचा मार्ग पुष्कळ सुकर होतो. कारण एकदा आमची मने केंद्रभूत दर्शनावर, दृश्यावर ठामपणे स्थिरावली आणि आमची इच्छाशक्ती आमच्या एकमेव साध्यासाठी परिश्रम करण्यास तयार झाली, म्हणजे मग जीवन आम्हाला मदत करू लागते.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 74)

श्रीअरविंद