प्रथम आम्ही ही गोष्ट निदर्शनास आणू इच्छितो की, भारतात आजही एक विलक्षण योगपद्धती अस्तित्वात आहे. ही पद्धती स्वभावत: समन्वयात्मक आहे. तथापि ही योगपद्धती एक स्वतंत्र योगच आहे; ती इतर योगपद्धतींचा काही समन्वय नाही. ही विलक्षण योगपद्धती म्हणजे तंत्रपद्धती होय. तंत्रमार्गात काही घटना घडून आल्याने, जे तांत्रिक नाहीत त्यांना तंत्रमार्ग निंद्य वाटू लागला आहे.

…तथापि तंत्रपद्धतीचे मूळ पाहता, ती एक महान प्रभावी पद्धती होती, तिचा पाया निदान अंशत: खऱ्या कल्पनांचा बनवलेला होता. तंत्राची दक्षिण (उजवा) आणि वाम (डावा) या मार्गात जी विभागणी केली होती, तिच्या मुळाशी देखील विशिष्ट खोल प्रतीती होती. प्राचीन प्रतीक-शास्त्रानुसार दक्षिण-मार्ग म्हणजे ज्ञानमार्ग व वाम-मार्ग म्हणजे आनंदमार्ग होय. दक्षिणमार्गामध्ये मानवातील प्रकृती स्वत:च्या ऊर्जा, स्वत:चे घटक आणि क्षमता यांचे शक्तिसामर्थ्य आणि त्यांचा व्यवहारातील वापर यामध्ये सारासारविवेकाद्वारे भेद करून, स्वत:ची मुक्तता करून घेते तर वाममार्गामध्ये मानवातील प्रकृती त्याच सर्व गोष्टींचा ‘आनंदमय’ रीतीने स्वीकार करून, स्वत:ची मुक्तता करून घेते.

याप्रमाणे मुळात तंत्रपद्धतींतील दक्षिणमार्ग व वाममार्ग निर्दोष असले तरी, कालांतराने त्यांची तत्त्वे अस्पष्ट झाली, त्यांची प्रतीके विकृत झाली व त्यांचा अध:पात घडून आला.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 42-43)

श्रीअरविंद