प्रत्येक मानवी कर्म ईश्वराच्या इच्छेला समर्पित करावे हे साध्य कर्ममार्ग मानवाच्या समोर ठेवतो. या मार्गाचा आरंभ, आमच्या कर्मामागे असणारा अहंभावप्रधान हेतू आम्ही सर्वथा टाकून द्यावा, स्वार्थी हेतूने कोणतेही कर्म आम्ही करू नये, सांसारिक फळासाठी कोणतेही कर्म आम्ही करू नये या व्रतापासून होतो. या त्यागाच्या व्रताने कर्ममार्ग हा आमचे मन व आमची इच्छा शुद्ध करू शकतो; या शुद्धिकरणाचा परिणाम म्हणून आम्हाला सहजच ही जाणीव होऊ लागते की, महान विश्वशक्ती हीच आमच्या सर्व कर्मांची खरी कर्ती आहे; आणि या शक्तीचा स्वामी ईश्वर हा या कर्माचा खरा स्वामी व नेता आहे; व्यक्ती हा केवळ एक मुखवटा आहे; व्यक्ती ही सबब आहे; या शक्तीचे ती एक साधन आहे. किंवा अधिक सकारात्मकपणे सांगावयाचे झाले तर व्यक्ती हे कर्माचे व सांसारिक संबंधाचे जाणीवयुक्त केंद्र आहे असे वर्णन करता येईल. कर्मयोगी कर्माची निवड व त्याची दिशा अधिकाधिक जाणीवपुर:सर ईश्वराच्या इच्छेवर आणि विश्वशक्तीवर सोपवितो. आमचे कर्म व आमच्या कर्माची फळे शेवटी ईश्वराला व त्याच्या विश्वशक्तीला समर्पण करण्यात येतात. आमचा आत्मा दृश्यांच्या कैदेत असतो तो मुक्त व्हावा; आमचा आत्मा प्रापंचिक व्यापारांच्या प्रतिक्रियांच्या बंधनात असतो, तो त्या बंधनातून मुक्त व्हावा हा या समर्पणाच्या मागचा हेतू असतो. भक्तिमार्ग व ज्ञानमार्ग यांच्याप्रमाणे कर्ममार्गही नामरूपात्मक अस्तित्वातून मुक्त होऊन परमात्म्यांत विलीन होण्यासाठी वापरला जातो.
– श्रीअरविंद
(CWSA 23 : 09-10)
- श्रीमाताजी आणि समीपता – २६ - May 21, 2025
- श्रीमाताजी आणि समीपता – २५ - May 20, 2025
- श्रीमाताजी आणि समीपता – २४ - May 19, 2025