बरेचदा असे आढळते की, जे लोक जंगलामध्ये एकटेच राहतात त्यांची आजूबाजूच्या प्राण्यांशी, झाडांशी मैत्री होते. पण असे एकटे राहण्यानेच, आंतरिक ध्यानामध्ये प्रविष्ट होण्याची वा परमसत्याशी योगयुक्त होऊन राहण्याची शक्ती तुम्हाला प्राप्त होते असे मात्र अजिबात नाही. जेव्हा तुम्हाला करण्यासारखे इतर काहीच नसते, अशा परिस्थितीमध्ये कदाचित ते सोपे असेलही पण मला ते काही तितकेसे पटत नाही. कारण माणूस कोणत्याही परिस्थितीत काही ना काही उद्योग शोधून काढतो.
मला माझ्या जीवनाच्या अनुभवावरून असे वाटते की, सर्व अडीअडचणींच्या धुमश्चक्रीत असतानासुद्धा जी व्यक्ती स्वत:च्या वृत्तीप्रवृत्तींचे दमन करण्यात यशस्वी होते, जी बाह्य परिस्थिती ईश्वरीकृपेने आपल्याला बहाल केलेली असते ती तशीच असतानादेखील, जी व्यक्ती आपल्या अंतरंगातील चिरंतन अस्तित्वासोबत अगदी एकटी राहण्यात यशस्वी होते, अशा वेळी त्या व्यक्तीला जो साक्षात्कार होतो तो अनंतपटीने अधिक खराखुरा, अधिक सखोल व अधिक चिरस्थायी असतो.
अडीअडचणींपासून पलायन करणे हा काही त्यांच्यावर विजय प्राप्त करण्याचा उपाय होऊ शकत नाही. तो नक्कीच आकर्षक आहे. जे लोक आध्यात्मिक जीवन जगू इच्छितात त्यांच्यामध्ये असे काहीतरी असते जे म्हणते, “झाडाखाली अगदी एकांतात बसणे, ध्यानमग्न होऊन राहणे, बोलण्याची वा कृतीची कोणतीही उर्मी नसणे, हे किती छान असेल.” हे असे वाटते ह्याचे कारण त्या दिशेने विचारांची ठाम बैठक तयार झालेली असते पण ती फारच फसवी असते.
ते ध्यान सर्वोत्तम असते की, जे अनिवार्य आवश्यकता असल्याप्रमाणे एकाएकी तुमचा ताबा घेते. तुम्हाला कोणता पर्यायच नसतो. एकाग्रता, ध्यान, बाह्य आवरणापलीकडे पाहणे ह्याशिवाय दुसरा कोणता पर्यायच तुमच्यापाशी नसतो. आणि अशी तुमची पकड घेण्यासाठी, तुम्ही अरण्यात एकांतवासात असण्याची गरज असत नाही; जेव्हा तुमच्यातील काहीतरी तयार असते, जेव्हा वेळ आलेली असते, जेव्हा तेथे खरी आस लागलेली असते आणि जेव्हा दिव्य कृपा तुमच्या सोबत असते, तेव्हा हे घडून येते.
मला वाटते की, मानवतेने प्रगतीचा काहीएक टप्पा गाठलेला आहे आणि आता जीवनामध्ये राहूनच खराखुरा विजय प्राप्त करून घेतला पाहिजे.
कोणत्याही प्रकारच्या बाह्य परिस्थितीत असतानादेखील, त्या चिरंतन, अनंत अस्तित्वासोबत एकाकीपणे कसे राहावयाचे हे तुम्हाला समजले पाहिजे. सर्व व्यवहार करीत असतानादेखील, त्यापासून मुक्त होऊन, त्या परमेश्वराला आपला सांगाती बनवून कसे राहावयाचे हे तुम्हाला समजले पाहिजे. हाच खरा विजय होय.
– श्रीमाताजी
(CWM 03 : 276)
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – २५ - October 2, 2023
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – २४ - October 1, 2023
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – २३ - September 30, 2023